केवळ सत्ता व पैशांसाठी भाजप-सेनेतील संघर्ष – अण्णा हजारे


अहमदनगर – ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राज्यात भाजप-सेनेमध्ये सुरू असलेला संघर्ष केवळ सत्ता व पैशांसाठी असल्याची टीका केली आहे. भाजप व सेनेमध्ये राज्यात सत्तास्थापनेबाबत एकमत होत नसल्याचे हजारे यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर राळेगणसिद्धी येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, त्यांनी निवडणुकीत तर गळ्यात हात टाकले होते ना? मग आता भांडण कशासाठी सुरू आहे? त्यामागे त्यांचा स्वार्थ आहे. त्यांचा केवळ सत्ता व पैशांसाठी संघर्ष सुरू आहे. एकदा गळ्यात हात टाकला तर तो नेहमी गळ्यातच राहिला पाहिजे. दोघे आता सत्तेसाठी भांडणे करू लागले आहेत, ते समाज व देशाच्या हिताचे नाही.

परतीच्या पावसामुळे राज्यातील बहुतांश भागांत पूर तसेच शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे. त्याची भरपाई देण्यास सरकारने प्राधान्य दिले पाहिजे. झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना भरपाई मिळाली पाहिजे. आपल्या कृषिप्रधान देशात शेतकरी आत्महत्या करतो यासारखे लांच्छनास्पद काय आहे? ही अपमानास्पद गोष्ट नाही का? राज्यात सध्या शेतकऱ्यांच्या वेदना समजून घेण्यापेक्षा खुर्चीसाठी संघर्ष सुरू आहे. सध्या सत्तेसाठी सुरू असलेल्या वाटाघाटीमुळे शेतकऱ्यांचे प्रश्न रेंगाळले आहेत. त्यांच्या सत्तेच्या वाटाघाटीनंतर वेळ पडली तर शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे आपण लक्ष घालू, असेही हजारे यांनी स्पष्ट केले.

Leave a Comment