फडणवीसांनी फोडला बॉम्ब, शिवसेनेच्या बसणार कानठळ्या


मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रिपदाचा फॉर्म्युला ठरलाच नव्हता, असा दावा करत शिवसेनेला चांगलंच अडचणीत आणले आहे. मिस्टर मुख्यमंत्र्यांनी मी मिरवणार आणि सगळ्यांची जिरवणार, असा इशाराच जणू शिवसेनेला दिला आहे. वाटायला काय, त्यांना पाचही वर्ष मुख्यमंत्रिपद पाहिजे, असे वाटू शकते, असा टोमणाही फडणवीसांनी लगावला. देवेंद्र फडणवीस यांनी दिवाळीनिमित्त पत्रकारांसोबत रंगलेल्या अनौपचारिक गप्पांदरम्यान अनेक ‘बॉम्ब’ फोडल्याने शिवसेनेला कानठळ्या बसणार आहेत.

विधानसभा निवडणुका चांगल्या पार पडल्या. महायुतीला निवडणुकीत चांगला प्रतिसाद मिळाला. लवकरच आम्ही सरकार स्थापन करु. पण काहीही बातम्या आल्या तरी आमचेच सरकार असेल, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी बोलून दाखवला. लवकरच फडणवीस सरकारच्या शपथविधीचा मुहूर्त कळेल. शपथविधी शक्यतो पुढच्या आठवड्यात पार पडेल, असे संकेतही फडणवीसांनी अनौपचारिक गप्पांदरम्यान दिले.

आमच्या अधिकृत आणि अनधिकृत बैठका सुरु आहेत. पण निवडणुकांपूर्वी कधीच अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रिपदाचा फॉर्म्युला ठरला नव्हता. वाटायला काय, त्यांना पाचही वर्ष मुख्यमंत्रिपद पाहिजे, असे वाटू शकते. वाटू शकणे आणि होणे यात फरक असल्याचे म्हणत शिवसेनेच्या मुख्यमंत्रिपदाच्या स्वप्नाला फडणवीसांनी टाचणी टोचली आहे.

1995 चा फॉर्म्युला वगैरे काहीही ठरलेले नाही. अजून काहीही मागणी शिवसेनेने केलेली नाही. सरकार स्थापनेबाबत मीडियाला सरप्राईज देणार असल्याचेही फडणवीस मिश्किलपणे म्हणाले. आतमध्ये काय आहे, हे तुम्हाला माहीत नाही. पण लवकरच फॉर्म्युला कळेल. आमचा ‘ए’ प्लॅनच आहे, बी प्लॅनची गरजच नसल्याचे फडणवीस म्हणाले.

मुंबईत भाजपाध्यक्ष अमित शहा येणार नसल्याचेही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. पंतप्रधानांनी स्पष्ट केलेच आहे, पण उद्या होणाऱ्या बैठकीत विधीमंडळाचा नेता कोण यावर शिक्कामोर्तब होईल, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी पुढील पाच वर्षांसाठी आपणच मुख्यमंत्री होणार असल्याचा पुनरुच्चार केला. ‘फर्स्ट क्लास फर्स्ट’ आलो आहोत, पण आमच्या मेरिटबद्दल कोणीच बोलत नसल्याची खंतही त्यांनी यावेळी बोलून दाखवली.

पावसात भिजावे लागते, याचा अनुभव आम्हाला कमी पडल्याचे म्हणत फडणवीसांनी शरद पवार यांना टोला लगावला आहे. साताऱ्यातील सभेत शरद पवारांनी पावसात भिजत भाषण केल्यानंतर लोकसभा पोटनिवडणुकीत उदयनराजे यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.

भाजपने 105 जागांसह सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान मिळवला. पण कोणत्याही एका पक्षाला 145 हा सत्तास्थापनेच्या आकडा गाठता आलेले नाही. शिवसेना 56 जागांसह दुसऱ्या, राष्ट्रवादी 54 जागांसह तिसऱ्या, काँग्रेस 44 जागांसह चौथ्या स्थानावर आहे. अपक्ष उमेदवारांना आपल्याकडे खेचून संख्याबळ वाढवण्याचा शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांचा प्रयत्न आहे. भाजपच्या गळाला आतापर्यंत आठ अपक्ष उमेदवार लागले असून शिवसेनेनेही पाच जणांचा पाठिंबा मिळवत संख्याबळ वाढवले आहे.

Leave a Comment