सत्तेचा माज असलेल्यांना जनतेने दाखवली त्यांची जागा – शरद पवार


मुंबई – राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सत्तेचा माज असलेल्यांना जनतेने जागा दाखवली. जे काही निवडणूक निकाल समोर आले त्यावरुन असेच दिसत असल्याचे म्हटले आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, शेकाप यांच्यासह मित्रपक्षांनी चांगली लढत दिली. आम्हाला महाराष्ट्रातील जनतेने चांगला प्रतिसाद दिला. पण भाजपचे आणि महायुतीचे अबकी बार २२० के पार हे स्वप्न आणि दावा काही पूर्ण होऊ शकला नाही. त्यांना त्यांची जागा लोकांनी दाखवल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे.

पंतप्रधान कलम ३७० रद्द करण्याबाबत बोलले होते की ते रद्द करुन दाखवावे, असे निर्णय ऐतिहासिक असतात. या निर्णयांबाबत पंतप्रधान असे वक्तव्य कसे काय करु शकतात? असाही प्रश्न शरद पवार यांनी विचारला. २२० च्या पुढे जागा महाराष्ट्र विधानसभेत महायुती जिंकेल असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. पण प्रत्यक्षात तसे काही घडले नाही. महायुतीमध्ये भाजपला १०० ते १०५ आसपास जागांवर आघाडी मिळाली आहे तर ६४ जागांवर शिवसेनेला आघाडी मिळाली आहे. बहुमताच्या आकड्याजवळ महायुती जाते आहे. मात्र भाजपच्या जागा कमी झाल्याने शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर वाढली आहे.

शिवसेनेला मुख्यमंत्रीपदाची ऑफर देऊन भाजपला सत्तेपासून बाजूला ठेवणार का? असा प्रश्न विचारला असता शरद पवार यांनी तूर्तास आमचा असा काही विचार नाही असे म्हटले आहे. आम्हाला आघाडीचे सहकार्य मिळाल्याचेही शरद पवार यांनी स्पष्ट केले. जनतेने पक्षांतर केलेल्या नेत्यांना स्वीकारले नसल्याचेही शरद पवार यांनी स्पष्ट केले. काही अपवाद वगळले तर काँग्रेस, राष्ट्रवादी यांची साथ सोडलेल्या नेत्यांना जनतेने कौल दिला नसल्याचेही शरद पवार यांनी स्पष्ट केले.

Leave a Comment