हिवाळा हा स्वभावतःच शीत हवामानाचा असतो. त्यामुळे शरीरातील संतुलन राखण्यासाठी उष्ण गुणात्मक आहाराचा समावेश हिवाळ्यामध्ये करणे गरजेचे असते. उष्ण वीर्यात्मक आहाराच्या सेवनाने शरीरातील अग्नी प्रदिप्त होतो. त्यामुळे भूक जास्त लागण्यास मदत होते शिवाय अन्नाचे सम्यक पचनही होते. हिवाळ्यामध्ये गुरु, स्निग्ध, उष्ण गुणात्मक आहार घ्यावा.
दुग्धजन्य पदार्थ – हिवाळ्यात दुध, तुप, लोणी यांचा आहारात समावेश करावा. यामध्ये भरपूर प्रमाणात स्निग्धता, कैलरीज असतात. त्यामुळे हिवाळ्यातील उष्णतेचे संतुलन राखण्यास मदत होते.
मांसाहार – मांसाहारी व्यक्तींनी हिवाळ्यामध्ये आहारात मटण, मांस, मासे, अंडी यासारख्या मांसाहाराचा समावेश करावा.
मसाला – विविध मसाल्याचे पदार्थ हे उष्ण वीर्याचे असतात. त्यामुळे आहारामध्ये तीळ, लसून, मिरी, मोहरी, लवंग, जीरे, आले, हिंग, तमालपत्र इ. मसाला वापरावा. मिरी, लसूण आणि तूप घालून चटणी करावी. हिंग, तुप, मोहरी, जीरे यांची ताकाला फोडणी देऊन ते ताक प्यावे. तीळाची चटणी करावी.
सुकामेवा – बदाम, काजू, मणूका, अक्रोड इ. सुकामेवा स्निग्ध उष्ण वीर्यात्मक असल्याने त्याचा आहारात समावेश करावा.
गहू, ज्वारी, बाजरी ह्या धान्यांपासून बनवलेल्या पदार्थांचा आहारात समावेश करावा. भाकरी बरोबर लोणी किंवा तुप खावे. तूर, उडीद, मटकी, कुळीथ इ. कडधान्यांचा वापर करावा. हंगामी फळे, हिरव्या पालेभाज्या, फळभाज्यांचाही हिवाळ्यामध्ये आहारात भरपूर समावेश करावा.
पाणी – कोमट पाणी प्यावे. त्यामुळे आहाराचे पचन योग्य प्रकारे होण्यास मदत होते.