ब्रिटनची राणी एलिझाबेथ आणि त्यांचे पती प्रिन्स फिलीप यांच्या विवाहाला तब्बल ७२ वर्षांचा काळ उलटून गेला आहे. या काळामध्ये या दाम्पत्याने निष्ठेने एकमेकांची साथ देत सहजीवनातील सर्व चढ-उतार एकत्र पार केले आहेत. आता या दाम्पत्याला चार अपत्ये, आठ नातवंडे आणि सात पतवंडेही आहेत. राणी एलिझाबेथ आणि प्रिन्सच्या विवाहाला राणीचे वडील सहावे जॉर्ज यांनी १९४६ साली परवानगी दिल्यानंतर हा विवाहसोहळा पार पडला. पण त्याकाळी ब्रिटन दुसऱ्या महायुद्धाच्या हानीतून नुकताच सावरत होता. याची जाणीव ठेऊन हा विवाहसोहळा देखील फार वायफळ खर्च न करता पार पडला. किंबहुना रेशनमध्ये येणारी कूपन वाचवून राणी एलिझाबेथने ती आपल्या विवाहासाठीच्या पोशाखासाठी वापरली असल्याचे ही म्हटले जाते.
राणी एलिझाबेथ आणि प्रिन्स फिलीप यांना विवाहानिमित्त सुमारे १७०० भेटवस्तू आल्या. यातील काही भेटवस्तू खास एलिझाबेथ करता होत्या. ब्रिटनमध्ये दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये अनेक वस्तूंवर निर्बंध लावले गेले होते. त्यामुळे कित्येक गरजेच्या वस्तू मिळेनाश्या झाल्या होत्या. बायकांना वापरण्यासाठी असलेले नायलॉनचे पायमोजे ( स्टॉकिंग्ज ) ही सहजासहजी मिळेनासे झाले होते. त्यामुळे राणी एलिझाबेथच्या विवाहाच्या निमिताने तिला अनेक उत्तम नायलॉन स्टॉकिंग्ज भेट म्हणून मिळाले.
महात्मा गांधी यांनी एक सुंदर सुती लेस स्वतः विणून राणी एलिझाबेथला भेट म्हणून पाठविली होती. त्या लेसवर ‘जय हिंद’ विणलेले होते. सुंदर, रसदार, घरच्या बागांमध्ये पिकविलेल्या सफरचंदांनी भरलेल्या पेट्या, अननसाचे पाचशे डबे, चोवीस हँड बॅग्ज, आणि जिन मद्याच्या बारा बाटल्या अश्या ही वस्तू राणी एलिझाबेथला विवाहानिमित्त भेट म्हणून मिळाल्या होत्या.