पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला शरद पवार


मुंबई: पूरस्थितीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे भेट घेणार आहेत. मुंबईत शरद पवार आणि मुख्यमंत्री फडवणीस यांची येत्या 20 तारखेला भेट घेणार आहेत. ही भेट कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील पूरपरिस्थितीबाबत होणार आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, कोल्हापूरचे राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी या भेटीवेळी उपस्थित राहणार आहेत.

यावेळी पूरग्रस्तांना मदत करण्यासंदर्भात तसेच पुनर्वसन करण्यासंदर्भात काही मागण्यांचे निवेदन देण्यात येणार आहे. तसेच या निवेदनात पुनर्वसन कशा पद्धतीने करायचे, त्यात कोणकोणत्या गोष्टी अपेक्षित आहेत, याची माहिती असेल. महापुराचा मोठा फटका कोल्हापूर, सांगली, सातारा, कोकण, नाशिकसह गडचिरोली या भागात बसला आहे. कोल्हापूर-सांगली जिल्ह्याचे महापुरामुळे अतोनात नुकसान झाले आहे. या जिल्ह्यांना पुन्हा उभे करण्यासाठी मदतीची गरज आहे. दोन्ही जिल्हे आठवडाभर पाण्यात होते.

या महापूरामुळे अनेकांच्या घरांची पडझड झाली त्याचबरोबर जनावरे देखील वाहून गेली आहेत. लाखो नागरिकांचे विस्थापन केले आहे. दोन्ही जिल्ह्यातील पाणीपातळी सध्या उतरुन, पूर ओसरला आहे. पण तेथे आता आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. शिवाय तेथील लोकांना राहायला घरे नाहीत, प्रापंचिक साहित्य वाहून गेले आहे. शेती आणि पीकं पूर्णत: नष्ट झाली असल्यामुळे कोल्हापूर-सांगलीच्या नागरिकांसमोर या भीषण संकटातून कसे सावरायचा असा प्रश्न आहे.

Leave a Comment