सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर टीम इंडिया असून विंडीज दौऱ्याची सुरुवात भारतीय संघाने विजयाने केली. भारताने 3 सामन्यांची टी-20 जिंकत विंडीजला व्हाईट वॉश दिला आणि मालिका 3-0 अशी जिंकली. दोन्ही संघ आता एकदिवसीय मालिकेतील शेवटच्या सामन्यात आमने-सामने येतील. पावसामुळे भारत-वेस्ट इंडिजमधील पहिला एकदिवसीय सामना रद्द झाल्यावर टीम इंडियाने दुसऱ्या एकदिवसीयमध्ये दमदार प्रदर्शन करत सामना जिंकला आणि 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी मिळवली. भारतासाठी या सामन्यात कर्णधार विराट कोहली आणि युवा खेळाडू श्रेयस अय्यर यांनी महत्वाची भूमिका बजावली. विराटने शतकी खेळी केली तर अय्यरने अर्धशतक करत संघाच्या विजयात हातभार लावला. विंडीजविरुद्ध टी-20 मालिकेत संघात स्थान न मिळाल्यावर अय्यरला एकदिवसीयमध्ये संधी देण्यात आली होती आणि मिळालेल्या संधीचे त्याने सोने केले. 68 चेंडूंत श्रेयसने 71 धावा केल्या.
श्रेयसने विंडीजविरुद्ध एकदिवसीयमध्ये अर्धशतकी खेळी करत चाहते आणि विशेषज्ञाची मने जिंकली. चहू बाजूने श्रेयसवर कौतुकांचा वर्षाव होत आहे. आता तिसऱ्या एकदिवसीय सामन्यासाठी भारत-विंडीज सज्ज होत आहे. याचदरम्यान, अय्यर शिखर धवन, खालील अहमद, कीरोन पोलार्ड आणि अन्य खेळाडूंसह मोकळ्या वेळेचा आनंद लुटत आहे. नुकतेच आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडिओ श्रेयसने शेअर केला आहे. तो यात टारझन बनलेला दिसत आहे. श्रेयसने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये एका दोरीच्या साहाय्याने तो पाण्यात उडी मारताना दिसत आहे. श्रेयसने व्हिडिओ शेअर करताना कॅप्शन देत लिहिले, तुम्ही मला सांगू शकत नाही की, मी हवेत उडू शकत नाही!
दुसरीकडे, माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर टीम इंडियाच्या चौथ्या क्रमांकावरील फलंदाच्या निवड विषयी म्हणाले की, मिळालेल्या संधीचे श्रेयसने सोने केले. पाचव्या क्रमांकावर तो फलंदाजीला आला, भरपूर ओव्हर त्याच्याकडे खेळण्यासाठी होत्या आणि सोबत कोहलीदेखील होता. सामन्याचा तणाव कोहलीने आपल्याकडे घेतल्यामुळे श्रेयसला खुलून खेळता आले आणि त्याला बरेच काही शिकायलाही मिळाले. हे देखील गावस्कर म्हणाले की चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी श्रेयस अय्यर हा उत्तम पर्याय ठरू शकतो आणि रिषभ पंत याला पाचव्या क्रमांकावर पाठण्याचे त्यांनी सुचवले.