पूरग्रस्तांचा मदत निधी रोख स्वरुपात मिळणार नाही


मुंबई : राज्य सरकारने पूरग्रस्तांना दिला जाणारा मदत निधी पीडितांच्या बँक खात्यात जमा करण्याचे आदेश दिले आहेत. सदर आदेश सरकारने काढलेल्या शासन अध्यादेशात दिले असून अशा स्थितीमध्ये पीडितांना बँकांच्या वाऱ्या करायला लावणे योग्य नसल्याची टीका काँग्रेसने केली आहे.

पूरग्रस्तांसाठी 154 कोटी रुपयांचा निधी मदत म्हणून सरकारद्वारे वर्ग करण्यात आला आहे. मृत व्यक्तींचे परिवार, जखमी तसेच पूरग्रस्तांना हा निधी देण्यात येणार आहे. संबंधितांच्या बँक अकाउंटमध्ये हा निधी जमा करण्याचे निर्देश या आदेशात दिले आहेत.

काँग्रेसने यावर जोरदार आक्षेप घेतला आहे. आपत्तीत आजवर शासकीय मदत ही रोख दिली गेली. पण शासनाने आता मदत बँक खात्यात जमा करण्याचे निर्देश दिले आहेत. लोकांचे संसार उद्धवस्त झाले असताना बँकेच्या वाऱ्या करायला लावणे योग्य नसून बँका शनिवार/रविवारी बंद असतात. अथवा लोकांपर्यंत बँक व्यवस्थापन पोहचवा ही विनंती, असल्याचे काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटले आहे.

शासनाच्या कालच्या अध्यादेशामध्ये पुरामध्ये दोन दिवसांपेक्षा अधिक काळ क्षेत्र पाण्याखाली असल्यास मदत मिळणार असल्याच्या आदेशावरून सरकारवर जोरदार टीका झाली आहे. यातच हा जीआर आल्याने पुन्हा सरकारवर टीकेची झोड उठली आहे. कोणत्याही परिस्थितीत रोख रकमेने निधी न देण्याचे देखील या आदेशात म्हटले आहे. पूरग्रस्त क्षेत्रात वीज नसल्याने तांत्रिक अडचणी आहेत. तसेच बँका, एटीएम देखील बंद असल्याने खात्यावरील पैसे पीडितांना कसे मिळणार? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

Leave a Comment