राज्य सरकारचा तुघलकी निर्णय, दोन दिवस घरात पुराचे पाणी असेल तरच मदत


मुंबई : हजारो लोक कोल्हापूर, सांगलीसहित राज्यात पुराच्या विळख्यात असताना पूरग्रस्तांसाठी राज्य सरकारने मदतीचा हात दिला खरा, पण हा हात तोकडा पडत असल्याचे दिसत आहे. कारण सरकारने पूरग्रस्तांची या मदतीद्वारे एकप्रकारे थट्टाच केली आहे. मोफत अन्नधान्य (10 किलो गहू आणि 10 किलो तांदूळ) पूरग्रस्ताचे क्षेत्र दोन दिवसांपेक्षा जास्त दिवस पाण्यात बुडाले असेल तरच देणार, असा अध्यादेश सरकारच्या अन्न आणि नागरी पुरवठा विभागाने जारी केला आहे.

एकीकडे पाण्यात, अडचणीत लोक असताना सरकार राज्यातील पूरग्रस्तांची या अटी आणि शर्तींमुळे थट्टा करण्यात धन्यता मानत आहे. पण हा केवळ उल्लेख असून, पुरात अडकलेल्या लोकांना सर्व मदत पोहोचवण्याचे काम कधीच सुरु झाल्याचे सरकारने म्हटले आहे. तसेच आघाडी सरकारच्या काळात हीच मर्यादा 7 दिवसांची होती आणि या सरकारने ती दोन दिवसांवर आणल्याचेही सरकारने म्हटले आहे. दरम्यान दिली जाणारी मदतही वाढवल्याचा सरकारचा दावा आहे.

Leave a Comment