चंद्रपुरातील शाळकरी मुलांशी आमिर खानने साधला संवाद


नुकताच चंद्रपुरातील बल्लारपूर येथे मिशन शक्ती या मोहिमेचा शुभारंभ करण्यासाठी बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अर्थात आमिर खान आला होता. त्याने यावेळी याठिकाणी उपस्थिती विद्यार्थ्यांना कानमंत्र दिला. तुम्हाला सर्वार्थाने आयुष्य कसे जगायचे हे खेळ शिकवतो. तुमचे संपूर्ण जग खेळच बदलू शकतो, असे आमिर यावेळी म्हणाला.

त्याने आपल्या शालेय जीवनाविषयीही यावेळी सांगितले. आमिर म्हणाला, आम्हाला आमच्या शालेय जीवनात खूप विषय होते. पण, मला काही विशेष गोडी अभ्यासात नव्हती. माझे लक्ष नेहमी खेळाकडे असायचे. मी अनेक खेळांमध्ये पारंगत होतो. पण आज जेव्हा मी मागे वळून बघतो तर मला इतिहास, भूगोल, गणित या अभ्यासाच्या विषयाबद्दल काहीही आठवत नाही. पण मी जे खेळ खेळलो त्याची प्रेरणा आजही माझ्यात आहे.

दरम्यान, मागील वर्षी जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांनी मिशन शौर्य या मोहिमेंतर्गत एव्हरेस्ट हे शिखर सर केले होते. त्याचेच पुढचे पाऊल म्हणून मिशन शक्ती ही मोहीम पालकमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून राबविण्यात येत आहे. मिशन शौर्य शक्ती ही मोहीम या माध्यमातून 2024 ऑलिम्पिक हे लक्ष्य ठेवून यामध्ये प्रतिनिधित्व करण्यासाठी सक्षम असे खेळाडू तयार करण्याच्या दृष्टीने सुरू करण्यात आली.

राज्याचे अर्थमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या कार्यक्रमादरम्यान मनोगत व्यक्त केले. हा जिल्हा खऱ्या अर्थाने हिऱ्याची खान असून भविष्यात चंद्रपूर आपली विशेष ओळख निर्माण करणार आहे, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. यानंतर आपण पहिल्यांदाच चंद्रपूर आणि बल्लारपुरात आलो असून सर्वांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून खरच भारावून गेलो असल्याचे आमिर खानने म्हटले.

Leave a Comment