अखेर धर्मसेनाने कबूल केली आपली अंतिम सामन्यातील ती चूक


नवी दिल्ली – आयसीसी विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीच्या सामन्यात शेवटच्या षटकात गुप्टीलने केलेल्या ओव्हर-थ्रो वर पंच कुमार धर्मसेना यांनी इंग्लंड संघाला 6 धावा बहाल केल्या होत्या. आता आपला तो निर्णय चुकीचा असल्याचे श्रीलंकेचे पंच कुमार धर्मसेनाने मान्य केले आहे. एका वृत्तपत्राशी बोलताना त्यांनी ही कबुली दिली आहे.

यजमान इंग्लंड विरुध्द न्यूझीलंड या संघात विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना झाला. निर्धारीत 50-50 षटकात आणि सुपर ओव्हरमध्ये हा सामना बरोबरीत सुटल्यामुळे इंग्लंडला आयसीसीच्या चौकाराच्या नियमाने विश्वविजेता घोषित करण्यात आले. दरम्यान या सामना ओव्हर-थ्रो वर पंचानी दिलेल्या निर्णयामुळे वादग्रस्त ठरला.

इंग्लंडला सामन्याच्या शेवटच्या 50 व्या षटकात विजयासाठी तीन चेंडूत 9 धावांची गरज होती. या षटकाच्या चौथ्या चेंडूवर 2 धावा घेण्याच्या प्रयत्नात असलेल्या बेन स्टोक्सला बाद करण्यासाठी गुप्टीलने थ्रो केला. स्टोक्सच्या बॅटला तो थ्रो लागून सीमारेषेबाहेर गेल्यामुळे इंग्लंडला पंचानी एकूण 6 धावा दिल्यामुळे हा सामना बरोबरीत सुटला. पंचाच्या त्या निर्णयावर सामन्यानंतर जगभरातून टीका करण्यात आली. प्रामुख्याने आयसीसी बेस्ट अंपायर पुरस्कार प्राप्त सायमन टॉफेल यांच्यासह अनेक दिग्गज खेळाडूंनी यामध्ये तो निर्णय चूकीचा असल्याचे सांगितले.

यानंतर आयसीसीने पंचाच्या या निर्णयावर हात वर केले होते. पण, त्या ओव्हर थ्रोवर 6 धावा देणारे श्रीलंकेचे अंपायर कुमार धर्मसेना यांनी आता आपण चूक केल्याचे मान्य केली. नियमानुसार गुप्टिलने थ्रो करण्यासाठी ज्यावेळी बॉल उचलला त्यावेळी अदिल राशिद आणि स्टोक्स दुसरी धाव घेताना एकमेकांचा क्रॉस झाले नव्हते. त्यामुळे 6 च्या ऐवजी 5 धावाच द्यायला हव्या होत्या असे धर्मसेना म्हणाले. मी सामना संपल्यानंतर टीव्ही रिप्ले पाहिल्यानंतर मला समजले की मी चूकीचा निर्णय घेतला. पण, त्यांनी आम्हाला टीव्ही रिप्लेची सुविधा मिळाली नसल्याने ‘त्या’ चुकीचा पश्चाताप झाला नाही असे धर्मसेना म्हणाले.

Leave a Comment