उपांत्य फेरीतील पराभवानंतर टीम इंडियात पडले दोन गट?


नवी दिल्ली – २०१९ विश्वचषक स्पर्धेतील विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाचे आव्हान अखेरीस संपुष्टात आले आहे. भारतावर १८ धावांनी मात करत न्यूझीलंडच्या संघाने अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित पक्के केले. भारतीय संघाच्या या पराभवानंतर आता झालेल्या पराभवाची कारणे शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे. भारतीय संघाच्या कामगिरीची दखल बीसीसीआयनेही घेतली असून, क्रिकेट प्रशासकीय समितीचे अधिकारी प्रशिक्षक रवी शास्त्री आणि कर्णधार विराट कोहली यांच्यासोबत बैठक घेणार आहेत. याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार टीम इंडियात उपांत्य फेरीतील पराभवानंतर दोन गट पडले आहेत.

वृत्तसंस्थेला भारतीय संघातील एका खेळाडूने नाव न घेण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीनुसार, सध्या दोन गटांमध्ये भारतीय संघ विभागला गेला आहे. या संदर्भातील वृत्त टाईम्स नाऊ या इंग्रजी संकेतस्थळाने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार कर्णधार विराट कोहलीचा पहिला गट असून उप-कर्णधार रोहित शर्माचा दुसरा गट आहे. कधीकधी एकमेकांशी चर्चा न करता कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री हे थेट निर्णय घेतात, ज्यामुळे गोंधळाचे वातावरण संघात निर्माण होते. विश्वचषकाचा संघ जाहीर होण्यापूर्वी अंबाती रायुडूऐवजी विजय शंकरला संघात स्थान देण्यावरुनही असाच गोंधळ निर्माण झाल्याचे त्या खेळाडूने स्पष्ट केले आहे.

कर्णधार विराट कोहलीला क्रिकेट प्रशासकीय समितीचे प्रमुख विनोद राय यांचा पाठिंबा असल्यामुळेच प्रक्षिक्षक अनिल कुंबळे यांच्याशी झालेला वाद, आफ्रिका आणि इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेत पराभव होऊनही विराटवर कारवाई करण्यात आली नव्हती. या खेळाडूने नाव न घेण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीनुसार, भारतीय संघात विराटच्या गटातील खेळाडूंना जागा मिळते. कितीही खराब अशी लोकेश राहुलची कामगिरी असली तरीही सलामीवीर, चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी त्याचा नेहमी विचार केला जातो. नाहीतर किमान १५ जणांच्या संघात तरी राहुल आपले स्थान टिकवतोच. आयपीएलमध्ये एकाच संघात खेळत असल्यामुळे युजवेंद्र चहल सध्या भारतीय संघात असल्याचा आरोप खेळाडूने केला आहे.

भारतीय संघात अंबाती रायुडूला जागा न मिळण्यामागेही संघ व्यवस्थापनाचा हात असल्याचा आरोप या खेळाडूने केला आहे. त्याचबरोबर टीम इंडियातील काही खेळाडू हे प्रशिक्षक रवी शास्त्री आणि गोलंदाजी प्रशिक्षक भारत अरुण यांच्या कामगिरीवर खुश नसल्याचेही वृत्त आहे. भारतीय संघ विश्वचषकानंतर वेस्ट इंडिज दौऱ्यावर रवाना होणार असल्यामुळे या प्रकरणात आता नेमक्या काय घडामोडी घडतात हे पाहणे औस्तुक्याचे ठरणार आहे.

Leave a Comment