रवी शास्त्रींनी सांगितले भारतीय संघाच्या पराभवाचे कारण


नवी दिल्ली – भारतीय संघाचे विश्वचषक स्पर्धेतील आव्हान अखेरीस संपुष्टात आले. भारताला उपांत्य फेरीत न्यूझीलंडकडून पराभव स्विकारावा लागला. साखळी फेरीत अव्वल कामगिरी करणारा भारतीय संघ, उपांत्य सामन्यात न्यूझीलंडच्या माऱ्यासमोर ढेपाळला. मोक्याच्या क्षणी भारताचे दिग्गज फलंदाज झटपट माघारी परतले. आम्हाला चौथ्या क्रमांकावर अनुभवी फलंदाज नसणे भोवल्याचे, भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी कबूल केले आहे.

आम्हाला मधल्या फळीत एका अनुभवी फलंदाजाची उणीव भासली. पण या गोष्टीचा विचार आता भविष्यासाठी करायचा आहे. भारतीय संघासाठी चौथ्या क्रमांकाची जागा नेहमी डोकेदुखी ठरली आहे. यंदाच्या स्पर्धेत चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी लोकेश राहुल, विजय शंकर सारखे खेळाडू होते. पण सगळे चित्र दुखापतीमुळे पालटले आणि नंतर जे काही घडले त्यावर नियंत्रण ठेवणे आमच्या हातात नव्हते.

पण आपल्याला भारतीय संघाच्या कामगिरीचा अभिमान असल्याचेही शास्त्री यांनी आवर्जून नमूद केले. एक खराब कामगिरी हे अजिबात सिद्ध करु शकत नाही की गेल्या २-३ वर्षांतील भारतीय संघ हा सर्वोत्तम संघ आहे. एका स्पर्धेत एका सामन्यात, अर्ध्या तासात आम्ही वाईट खेळलो, पण आता या गोष्टीचा विचार करण्यात काहीच अर्थ नाही. प्रत्येक खेळाडूला या पराभवाचे वाईट वाटणे साहजिक आहे, पण संघातील प्रत्येक खेळाडूने चांगला खेळ केला आहे. रवी शास्त्रींनी आपल्या संघाचे कौतुक केले. दरम्यान विश्वचषक स्पर्धा संपल्यानंतर भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर रवाना होणार आहे.

Leave a Comment