यामुळे धोनी प्रत्येक सामन्यात वापरतो तीन बॅट


लंडन : आयसीसी विश्वचषक स्पर्धेत भारताने उपांत्यफेरीत मजल मारली आहे. पण भारतीय क्रिकेट चाहत्यांचा आवडता खेळाडू महेंद्र सिंह धोनीचा यंदाचा हा विश्चचषक शेवटचा विश्वचषक ठरु शकतो. धोनी यंदाच्या विश्वचषकात फलंदाजीमध्ये काही खास कामगिरी करु शकला नाही. सात सामन्यांमध्ये 93 च्या स्ट्राईक रेटने अवघ्या 223 धावा काढल्या आहेत. त्यामुळे त्याच्या या मंद खेळीवर अनेक क्रिकेट समीक्षकांकडून टीका केली जात आहे.

धोनीचा हा विश्वचषक शेवटचा विश्वचषक ठरला, तरी तुमच्या-आमच्या मनातून तो कधीही आऊट होणार नाही. त्याचे कारण म्हणजे धोनीचा स्वभाव आहे. कितीही बिकट परिस्थिती मैदानावर असली, तरी ती धोनी अगदी सहज सांभाळतो. धोनी मैदानावर असो किंवा मैदानाबाहेर नेहमीच सर्वांची मने जिंकतो. आपण आजवर त्याच्या नम्रपणाचे अनेक किस्से ऐकले असतील. सध्या विश्वचषकात अशीच एक गोष्ट घडत आहे.

धोनी सध्याच्या विश्वचषकात कुठल्याही सामन्यादरम्यान फलंदाजी करताना तीन वेगवेगळ्या बॅट वापरतो. वेगवेगळ्या स्पॉन्सरच्या या तिन्ही बॅट असतात. धोनी कधी SS, SG तर कधी BAS कंपनीच्या बॅटने खेळताना दिसतो. सामन्यात तीन वेगवेगळ्या बॅटने धोनी का खेळतो, याचे रहस्य त्याचे मॅनेजर अरुण पांडे यांनी आता उघड केले आहे.

‘एमएस धोनी द अनटोल्ड स्टोरी’मध्ये धोनीच्या जीवनातील संघर्ष, त्याचा एक क्रिकेटर होण्याचा प्रवास आपण पाहिला आहे. त्याला त्यामध्ये एक बॅट मिळवण्यासाठी किती प्रयत्न करावे लागतात, त्यासाठी त्याचा मित्र कंपनीमालकाकडे किती विनवण्या करतो, हेही आपण त्या चित्रपटात पाहिले आहे. धोनी याच कंपनींच्या उपकाराचे कर्ज फेडण्यासाठी या तीन वेगवेगळ्या बॅटने खेळतो.

धोनीचे मन खूप मोठे आहे. पैशांची त्याला गरज नाही. त्याच्याजवळ खूप पैसा आहे. तीन वेगवेगळ्या स्पॉन्सर्सच्या बॅट तो सामन्यादरम्यान वापरतो, त्यामागे एक चांगली भावना आहे. धोनीच्या क्रिकेटमधील करिअरच्या सुरुवातीपासून BAS ही कंपनी त्याच्यासोबत आहे. तर त्याला SG, SS या कंपनीनेही खूप मदत केली आहे. तो त्यामुळे या तीनही कंपनीच्या बॅटने तो विश्वचषकात खेळतो आहे आणि त्यासाठी तो पैसेही घेत नसल्याचे मॅनेजर अरुण पांडे यांनी सांगितले.

धोनीने 2004 मध्ये जेव्हा एक दिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये पदार्पण केले होते. तो तेव्हा BAS च्या बॅटने खेळायचा. तो त्यानंतर अनेक कंपन्याच्या बॅटने खेळला. पण, त्याच्या सुरुवातीच्या काळात ज्या तीन कंपन्यांनी त्याला मदत केली, आज क्रिकेट करिअरच्या शेवटच्या दिवसांमध्ये तो त्याच कंपनींच्या बॅटने खेळतो आहे.


धोनीने विश्वचषक 2011च्या अंतिम सामन्यात श्रीलंका विरुद्ध षटकार ठोकून भारताला जिंकवले होते. 1.11 कोटी रुपयांमध्ये त्याच्या त्या बॅटचा लिलाव झाला होता. क्रिकेटच्या इतिहासात ती बॅट सर्वात महाग बॅट पैकी एक समजली जाते. गेल्या वर्षीपर्यंत धोनी SG आणि BAS व्यतिरिक्त स्पार्टनची बॅटही वापरायचा. मात्र, त्या कंपनीने धोनीला निश्चित रकम दिली नाही. त्यानंतर धोनीने त्या कंपनीवर केस केली.

Leave a Comment