बर्मिंगहँगवर उपांत्य फेरीत ‘या’ संघाशी भिडणार भारतीय संघ ?


लंडन – आयसीसी विश्वचषक स्पर्धेत मंगळवारच्या लढतीत भारतीय संघाने बांगलादेशवर विजय मिळवून उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले. तर बुधवारी न्यूझीलंडला पराभूत करून इंग्लंडने अंतिम चौघांत प्रवेश केला. उपांत्य फेरीतील ऑस्ट्रेलिया, भारत, इंग्लंड आणि न्यूझीलंड यांचे संघ हे जवळपास निश्चित आहेत. कारण, कितीही झाले तरी या शर्यतीत असलेल्या पाकिस्तानला मोठ्या फरकाने विजय मिळवून उपांत्य फेरीत प्रवेश करणे हे अशक्यच असल्यामुळे अखेरच्या साखळी सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्या निकालानंतर गुणतालिकेतील क्रमवारी निश्चित होईल. पण, सद्य स्थितीत भारताला उपांत्य फेरीत कोणाचा सामना करावा लागेल हे निश्चित झालेले पाहायला मिळत आहे.

साखळी फेरीचे सर्व सामने या आठवड्यात संपतील. उपांत्य फेरीतील आपले स्थान ऑस्ट्रेलियाने पक्के केले आहे. अखेरच्या साखळी सामन्यात त्यांना दक्षिण आफ्रिकेचा सामना करावा लागणार आहे. आफ्रिकेची कामगिरी पाहता ऑस्ट्रेलिया हा सामना जिंकून 16 गुणांसह अव्वल स्थानी कायम राहिल. भारतीय संघ त्यापाठोपाठ असेल. अखेरच्या लढतीत भारताला श्रीलंकेचा सामना करायचा आहे आणि भारतीय संघ ही लढत जिंकून दुसऱ्या स्थानावर राहिल. अखेरच्या लढतीत ऑस्ट्रेलियाला पराभव पत्करावा लागल्यास दुसऱ्या स्थानी त्यांची घसरण होईल आणि टीम इंडिया टॉप वर राहिल. पण, तशी शक्यता फार कमीच आहे. इंग्लंडने तिसऱ्या स्थानावर आपले स्थान पक्के केले आहे. न्यूझीलंड चौथ्या स्थानावर असेल.

आयसीसीच्या नियोजित वेळापत्रकानुसार गुणतालिकेतील अव्वल संघ हा उपांत्य फेरीत चौथ्या स्थानावरील संघाशी, तर दुसऱ्या उपांत्य फेरीत दुसऱ्या व तिसऱ्या स्थानावरील संघ यांच्यात सामना होईल. त्यानुसार ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड हा पहिला उपांत्य सामना मँचेस्टर येथे होईल, तर भारत विरुद्ध इंग्लंड असा दुसरा उपांत्य फेरीचा सामना बर्मिंगहॅम येथे होईल. पण, जर ऑस्ट्रेलिया अखेरच्या साखळी सामन्यात पराभूत झाल्यास आणि दुसरीकडे भारताने विजय मिळवल्यास ही क्रमवारी बदलेल. भारत अव्वल स्थानावर जाईल आणि ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागल्यास. भारत विरुद्ध न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लड असे उपांत्य फेरीचे सामने होतील.

Leave a Comment