बर्मिंगहम – काल आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारत आणि इंग्लंड दरम्यान झालेल्या सामन्यात इंग्लंडने भारताचा ३१ धावांनी पराभव केला. भारतीय संघ इंग्लंडने दिलेल्या ३३७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ३०६ धावांपर्यंत मजल मारु शकला. सलामीवीर रोहित शर्माचे शतक या पराभवामुळे व्यर्थ ठरले. ३७ व्या षटकात १०२ धावांची खेळी करणाऱ्या रोहितला अखेर ख्रिस व्होक्सने बाद केले.
यंदाच्या विश्वचषकात सर्वाधिक शतके झळकवणारा रोहित एकमेव फलंदाज
रोहितच्या या शतकामुळे त्याच्या नावावर विश्वचषक स्पर्धेत ३ शतके जमा झाल्यामुळे तो स्पर्धेत सर्वाधिक शतके करण्याच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर आहे. त्याने याअगोदर दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यात शतके झळकावली आहेत. मोठ्या खेळ्या केल्यामुळे स्पर्धेत सर्वाधिक धावा काढण्याच्या बाबतीत तो सहाव्या क्रमांकावर पोहचला आहे. आत्तापर्यंतच्या सामन्यात मिळून त्याच्या ४४० धावा झाल्या आहेत. सर्वाधिक धावांच्या बाबतीत ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर पहिल्या क्रमांकावर आहे. त्याच्या नावावर ५१६ धावा जमा आहेत.