फक्त दोनच आठवड्यात हार्दिकला बनवून दाखवतो जगातील सर्वोत्तम अष्टपैलू


लंडन : टीम इंडियाने वेस्ट इंडिजचा आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत काल (गुरुवारी) झालेल्या सामन्यात 125 धावांनी धुव्वा उडवला. भारताने या विजयासह विश्वचषकाच्या उपांत्य फेरीच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकले आहे. हा सामना भारताने गोलंदाजांमुळे जिंकला असला तरी या सामन्यात टीम इंडियाच्या फलंदाजांनीदेखील बरी कामगिरी केली होती. भारताने कर्णधार विराट कोहली, एमएस धोनी आणि हार्दिक पांड्यांच्या फलंदाजीच्या जोरावार विंडीजसमोर 268 धावा उभारल्या होत्या.

भारताची धावगती मधल्या षटकांमध्ये खूपच धिमी झाली होती. परंतु मैदानात हार्दिक पांड्या उतरल्यानंतर त्याने चांगली फटकेबाजी केली. अंतिम षटकात त्याने आणि धोनीने केलेल्या फटकेबाजीमुळे भारताला 250 धावांचा टप्पा पार करता आला. भारताकडून कर्णधार विराट कोहलीने 82 चेंडूत 72, धोनीने 61 चेंडूत 54 आणि पांड्याने 38 चेंडूत 46 धावा केल्या होत्या. अष्टपैलू हार्दिक पांड्याने गोलंदाजी करताना 5 षटकांत 28 धावा देत 1 बळीदेखील घेतला होता.


वर्ल्डकपमध्ये आतापर्यंत हार्दिक पांड्याने चांगली कामगिरी केली असली तरी, त्याच्यावर पाकिस्तानचा माजी क्रिकेटर अब्दुल रज्जाक मात्र नाराज आहे. त्याने हार्दिकच्या खेळात अनेक त्रुटी असल्याचे म्हटल्यामुळे चांगल्या प्रक्षिक्षणाची गरज हार्दिकला असून त्यासाठी मी तयार असल्याचेही रज्जाकने म्हटले आहे.


ट्विटरवर रज्जाकने म्हटले आहे की, मी हार्दिक पांड्याला खेळताना पाहिले, अनेक त्रुटी त्याच्या खेळीत असल्याचे मला जाणवले. त्याचा बॉडी बॅलेंस चुकीचा आहे. हार्दिकला त्याच्या फुटवर्कवर काम करण्याची गरज आहे. माझ्या मार्गदर्शनाची त्याला गरज आहे. त्याला प्रशिक्षण देऊन मी जगातला सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू बनवू शकतो. तसे बीसीसीआयला वाटत असल्यास त्यांनी मला सांगावे आणि त्यासाठी मी सदैव तयार आहे.

Leave a Comment