मुंबई – भाजप-शिवसेना महायुतीला लोकसभा निवडणुकीमध्ये भरघोस यशामध्ये रामदास आठवलेंच्या रिपाइंचा महत्त्वाचा सहभाग असल्यामुळे आता रिपाइंला मंत्रिमंडळ विस्तारामध्ये एका मंत्रिपदाची मागणी तसेच आगामी विधानसभा निवडणुकीत 10 जागा आणि रिक्त महामंडळांवरील नियुक्त्या, अशा सर्व मागण्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केल्याचे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगितले.
रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी वर्षा निवासस्थानी अर्धा तास चर्चा केली. यामध्ये मुख्यमंत्र्यांनी रिपाइंच्या वतीने केलेल्या सर्व मागण्या मान्य केल्याची माहिती बैठकीनंतर पत्रकार परिषदेत त्यांनी दिली. तसेच मुंबईतील राजगृह येथील बाबासाहेब आंबेडकरांचे निवासस्थान घर राष्ट्रीय स्मारक म्हणून जाहीर करावे. सध्या तिथे राहत असलेले प्रकाश आंबेडकर यांचे कुटुंबीय आणि भाडेकरू त्यांचे त्यासाठी योग्य पुनर्वसन करण्यात यावे, अशीही मागणी आठवले यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. मुंबईतील इंदू मिलमधील प्रस्थापित डॉ. आंबेडकरांच्या स्मारकाबाबत चौथरा सोडून 350 फुटाचा आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा आणि स्मारकाचे काम वेगाने सुरू करण्याबाबतची मागणीही मुख्यमंत्र्यांनी मागणी मान्य केली असल्याचे सांगितले.
नुकताच राज्यातील दुष्काळी भागाचा केंद्रीय राज्यमंत्री आठवले यांनी दौरा केला होता. आठवलेंनी मुख्यमंत्र्यांपुढे नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून दुष्काळी भागाला पाणी देणे आणि कायमस्वरूपी दुष्काळ निवारण करणे याही मागण्या ठेवल्या असून याही मागण्या मान्य केल्या असून त्यावर लवकरच कार्यवाही होईल अशी माहिती त्यांनी दिली. आपण केंद्रातील राज्यमंत्री पदाबाबत समाधानी असून राज्यातही रिपाइंला सन्मानजनक मंत्रीपद मिळेल असा विश्वास रामदास आठवले यांनी यावेळी व्यक्त केला.