सरकारी कर्मचाऱ्यांच्या लंच टाईमवर गंडांतर


मुंबई- दुपारी एक ते दोनची वेळ सरकारी कर्मचाऱ्यांच्या जेवणासाठी दिलेली असून आता या दुपारच्या लंच टाईमवर गंडातर आले आहे. केवळ अर्ध्या तासातच सरकारी कर्मचाऱ्यांनी जेवण उरकावे, असा शासन आदेशच निर्गमित करण्यात आला आहे. राज्य शासनाने ४ जूनला हा शासन आदेश कामचुकार कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्यासाठी जारी केला आहे.

जेवणाची सुट्टी तासभर असली तरी अर्ध्यातासात जेवण उरकावे, असे आदेशात नमूद करण्यात आले आहेत. तसेच या सूचनांचे पालन नियमित होण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी खबरदारी घ्यावी, असेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

सध्या सर्वत्र दुपारी एक ते दोन कर्मचाऱ्यांना जेवणाची सुट्टी दिली जाते. पण २१ ऑगस्ट १९८८ च्या शासन निर्णयानुसार सरकारी कार्यालयीन वेळेत दुपारच्या भोजनासाठी अर्धा तासाची सुट्टी आहे. हे निदर्शनाला आणण्यात आले आहे. नागरीक अनेक ठिकाणी सरकारी कार्यालयात आपल्या तक्रारी घेऊन आल्यास त्यांना अनेकदा अधिकारी आणि कर्मचारी दुपारच्या वेळेत उपलब्ध होत नाहीत. तसेच अनेकदा जेवणाची सुट्टीच्या नावाखाली कार्यालयात अनुपस्थित असल्याचे शासनाच्या निदर्शनास आल्यामुळे हा संबंधित आदेश जारी करण्यात आल्याचे सामान्य प्रशासन विभागातल्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

दुपारी १ ते २ या वेळेत जेवणासाठी जास्तीत जास्त अर्ध्या तासाची वेळ राज्यातील सर्व सरकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांच्याकरीता देण्यात आली आहे. त्याचबरोबर एकाच कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी एकाच वेळी जेवणासाठी जाणार नाहीत, याची खबरदारी घेण्याच्या सूचनाही कार्यालय प्रमुखांना या आदेशात देण्यात आल्या आहेत.

Leave a Comment