काँग्रेसमध्ये विलीन होणार राष्ट्रवादी


नवी दिल्ली : भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा विलीन होण्यासाठी हालचाली सुरु झाल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली असून राहुल गांधी यांनी त्यासाठीच नवी दिल्लीतील शरद पवारांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा लोकसभेतील मोठ्या पराभवानंतर मुख्य काँग्रेसमध्ये विलीन करण्याच्या दृष्टीने राहुल आणि पवार यांच्यात चर्चा झाल्याची माहिती मिळाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्याचा निर्णय शरद पवारांनी घेतला तर ती इतिहासाची पुनरावृत्ती ठरेल. यापूर्वी 1986 मध्ये शरद पवारांनी त्यांची समाजवादी काँग्रेस, काँग्रेसमध्ये विलीन केली होती. औरंगाबादमध्ये हे विलीनीकरण तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या उपस्थितीत पार पडले होते.

काँग्रेसमध्ये राष्ट्रवादी पक्ष विलीन झाला तर लोकसभा आणि राज्यसभेचे विरोधी पक्षनेतेपद काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या वाट्याला येऊ शकते. सध्या केवळ 51 खासदारांचे काँग्रेसकडे संख्याबळ आहे. कोणत्याही पक्षाकडे किमान 55 खासदारांचे संख्याबळ लोकसभेचे अधिकृत विरोधी पक्षनेतेपद मिळवण्यासाठी असणे आवश्यक आहे. 5 खासदार राष्ट्रवादीकडे असल्यामुळे राष्ट्रवादी पक्ष काँग्रेमध्ये विलिन केल्यानंतर काँग्रेसच्या खासदारांचे संख्याबळ 55 पेक्षा जास्त होईल, त्यामुळे त्यांना अधिकृत विरोधी पक्षनेतेपद मिळवता येईल.

काँग्रेसचा 2014 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झाला होता. केवळ 44 जागा काँग्रेसने जिंकल्या होत्या. त्यामुळे काँग्रेसला लोकसभेच्या विरोधी पक्षनेते पदाला मुकावे लागले होते. काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांना लोकसभेचे विरोधी पक्षनेतेपद होते, परंतु काँग्रेसकडे अधिकृत विरोधी पक्षनेतेपद नव्हते.

यंदा झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने केवळ 51 जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे यंदादेखील काँग्रेसला लोकसभेचे अधिकृत विरोधी पक्षनेतेपद मिळणार नाही. त्यामुळेच राहुल गांधी राष्ट्रवादीचे काँग्रेसमध्ये विलिनीकरण व्हावे यासाठी प्रयत्न करत आहेत.

Leave a Comment