ज्या पंडिताने लावले लग्न त्याच्याचसोबत वधू पसार !


ही घटना अगदी एखाद्या बॉलीवूडच्या चित्रपटाला शोभेल अशीच आहे. मात्र या घटनेतील पात्रे काल्पनिक नसून ही घटना काही काळापूर्वी वास्तवात घडली आहे. घटना आहे मध्य प्रदेशातील सिरोंज प्रांतातील टोरी बारगोद गावातली. या गावातील एका युवतीचा विवाह ज्या पुरोहिताने संपन्न करविला, त्याच पुरोहिताच्या सोबत ही नववधू लग्नाला तीन आठवडे उलटून गेल्यानंतर पसार झाल्यामुळे समस्त गावामध्ये सर्वांच्या तोंडी सध्या हाच विषय सुरु आहे. झाले असे, की टोरी बारगोद गावामध्ये राहणाऱ्या एकवीस वर्षीय युवतीचा विवाह, आसट नामक गावातील एका तरुणाशी पार पडला. विवाह अगदी साग्रसंगीत, देवा-ब्राह्मणांच्या साक्षीने, परिवारजन आणि मित्रमंडळींच्या उपस्थितीमध्ये मोठ्या थाटामाटात पार पडला. हा विवाह वधूच्या माहेरी, म्हणजेच टोरी बारगोद मध्ये पार पडला असून, हे विवाहविधी संपन्न करण्यासाठी गावातील पुरोहित विनोद शर्माला आमंत्रित करण्यात आले होते.

विवाहसोहोळा संपन्न झाल्यानंतर अर्थातच वधूची सासरी पाठवणी करण्यात आली. वधू आपल्या सासरी तीन दिवस मुक्काम करून माहेरपणासाठी पुन्हा गावी परतली. २३ मेच्या रात्री या युवतीच्या घरातील सर्व परिवारजन गावातील आणखी एका विवाहसोहळ्यामध्ये सहभागी होण्यास गेले असता, घरात इतर कोणी नसल्याची संधी या युवतीने साधली आणि ज्या पुरोहिताने तिचे विवाहविधी संपन्न करविले होते, त्याच्याचसोबत ही युवती पसार झाली. युवतीचे परिवारजन जेव्हा विवाहसोहळा आटपून घरी परतले तेव्हा त्यांना सर्व प्रकार समजला आणि त्याचबरोबर घरातील दीड लाख रुपये किंमतीचे दागिने आणि तीस हजार रोख रक्कमही युवतीने आपल्या सोबत नेली असल्याचे लक्षात आल्यावर युवतीच्या परिवारजनांनी त्वरित पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी आता ‘मिसिंग रिपोर्ट’ फाईल केला असून, युवती आणि पुरोहिताचा शोध सुरु असल्याचे समजते.

Leave a Comment