मुंबई – भारतीय निवड समितीने काल एकदिवसीय विश्वचषकासाठी १५ सदस्यीय संघाची घोषणा केली असून ज्यात विराट कोहली, शिखर धवन, रोहित शर्मा, महेंद्रसिंग धोनी, केदार जाधव, हार्दिक पांड्या, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, लोकेश राहुल, दिनेश कार्तिक, विजय शंकर आणि रवींद्र जडेजा यांची निवड करण्यात आली होती.
टीम इंडियाची विश्वचषकासाठी निवड करणाऱ्या समितीच्या सदस्यांनी खेळले आहेत एवढे सामने
विश्वचषकासाठी भारताचा संघ निवड समितीचे अध्यक्ष एम. एस. के. प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय समितीकडून निवडण्यात आला आहे. केवळ ३१ एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने या समितीत समावेश असलेल्या पाच सदस्यांनी मिळून खेळले आहेत. यात निवड समितीचे अध्यक्ष प्रसाद यांनी १७, देवांग गांधींनी ३, शरणदीप सिंह यांनी ५, जतिन परांजपेंनी ४ तर गगन खोडा यांनी फक्त २ एकदिवसीय सामने खेळले आहेत. निवड समितीतील सदस्यांनी खेळलेल्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांची संख्या लक्षात घेता, हे समजते की निवडकर्त्यांकडे एकदिवसीय सामने खेळण्याचा अनुभव हा फारच कमी आहे.