
मुंबई: सय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धेत मुंबईचा युवा फलंदाज श्रेयस अय्यरने तुफानी खेळी केली. सिक्कीमविरुद्धच्या सामन्यात श्रेयसने अवघ्या 38 चेंडूत शतक झळकवले आहे. श्रेयसने या सामन्यात झंझावाती खेळी करत अवघ्या 55 चेंडूत 147 धावा कुटल्या. टी 20 क्रिकेटमध्ये या वादळी खेळीमुळे सर्वाधिक (147) धावा ठोकणारा तो भारताचा पहिला फलंदाज ठरला आहे. 24 वर्षीय श्रेयसने टी-20 प्रकारात रोहित शर्मा, विराट कोहली यांसारख्या दिग्गजांना मागे टाकले आहे.
टी-20 श्रेयस अय्यरने 15 षटकारांसह 38 चेंडूत झळकवले शतक
55 चेंडूत 15 षटकार आणि 7 चौकारांसह श्रेयस अय्यरने 147 धावा कुटल्या. तिसऱ्या विकेटसाठीत्याने सूर्यकुमार यादवसह (33 चेंडूत 63) 213 धावांची भागीदारी केली. मुंबईने श्रेयसच्या या तुफानी खेळीमुळे 20 षटकात 4 बाद 258 असा धावांचा डोंगर उभारला. श्रेयस अय्यर बाद झाल्यानंतर मुंबईच्या टीमने शेवटच्या 4 षटकात अवघ्या 23 धावा बनवल्या. अन्यथा मुंबईची धावसंख्या आणखी वाढली असती. दरम्यान 258 धावांचा पाठलाग करणाऱ्या सिक्कीमने 20 षटकात 7 बाद 104 धावांपर्यंतच मजल मारली. त्यामुळे मुंबईने हा सामना तब्बल 154 धावांनी जिंकला.
