महाराष्ट्रातील दुष्काळ निवारणासाठी केंद्राकडून ४ हजार ७१४ कोटींचे पॅकेज

drought
नवी दिल्ली – केंद्र सरकारकडून दुष्काळाचे चटके सोसणाऱ्या महाराष्ट्राला आर्थिक मदत जाहीर झाली आहे. ४ हजार ७१४. २८ कोटी रुपयांची मदत केंद्राकडून जाहीर झाली आहे. एकूण सहा राज्यांना केंद्र सरकारने मदत जाहीर केली असून महाराष्ट्राला यात ४ हजार कोटी रुपयांची मदत जाहीर झाली आहे. ही मदत दुष्काळ निवारणासाठी देण्यात आली आहे.


केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक मंगळवारी दिल्लीत पार पडली. या बैठकीत नैसर्गिक आपत्तीचा सामना करणाऱ्या राज्यांसाठी एकूण ७, २१४. ०३ कोटी रुपयांची मदत मंजूर करण्याचा निर्णय घेण्यात आला. यात हिमाचल प्रदेशसाठी ३१७. ४४ कोटी, उत्तर प्रदेशसाठी १९१. ७२ कोटी रुपये, आंध्र प्रदेशसाठी ९००. ४० कोटी रुपये, गुजरातसाठी १२७. ६० कोटी रुपये आणि कर्नाटकसाठी ९४९. ४९ कोटी रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे. तर महाराष्ट्राला ४, ७१४. २८ कोटी रुपयांची आणि पुद्दचेरीसाठी १३. ०९ कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

दरम्यान, राज्य सरकारने केंद्राकडे दुष्काळामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे झालेले आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी ७ हजार ९५० कोटी रुपयांच्या मदतीचा प्रस्ताव पाठवल्याचे वृत्त होते. पण यापैकी ४ हजार कोटींचीच केंद्राने मदत जाहीर केली आहे.

Leave a Comment