मुंबई: भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांची हत्या गेल्या लोकसभा निवडणुकीत ईव्हीएम हॅक करण्यात आल्याची माहिती असल्यानेच करण्यात आल्याचा खळबळजनक दावा एका सायबर तज्ज्ञाने केल्यानंतर देशातील राजकारण ढवळून निघाले आहे. रॉ किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांकडून या प्रकरणाची चौकशी केली जावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनी केली.
भाजपने गेल्या लोकसभा निवडणुकीत ईव्हीएम हॅक करुन विजय मिळवल्याचा दावा अमेरिकन सायबर तज्ज्ञाने केला. गोपीनाथ मुंडे यांची हत्या या संपूर्ण प्रकरणाची कल्पना असल्यानेच करण्यात आल्याचा दावाही त्याने केला. धनंजय मुंडेंनी याबद्दल आश्चर्य व्यक्त केले. नेहमीच गोपीनाथ मुंडेंवर प्रेम करणाऱ्यांनी त्यांच्या मृत्यूबद्दल प्रश्न उपस्थित केले. गोपीनाथ मुंडेंचा मृत्यू हा अपघात होता की अपघात, याची चौकशी व्हायला हवी, अशी मागणी धनंजय मुंडेंनी केली. त्यांनी या संदर्भात एक ट्विट केले आहे. एका सायबर तज्ज्ञाने गोपीनाथराव मुंडे यांची हत्या झाल्याचा दावा केला आहे. रॉ किंवा सर्वोच्च न्यायालयाकडून या दाव्याची चौकशी झाली पाहिजे. कारण ही माहिती एका लोकनेत्याशी संबंधित असल्याचे मुंडेंनी ट्विटमध्ये म्हटले आहे.