मुंबई – ऑस्ट्रेलियाविरुध्दच्या एकदिवसीय मालिकेत भारताने २-१ असा ऐतिहासिक विजय मिळवला. दरम्यान महेंद्रसिंह धोनीची चर्चा मालिकेआधी आणि नंतरही होत आहे. भारतीय कर्णधार विराट कोहलीने या सर्वावर बोलताना धोनीची प्रशंसा करताना म्हटले आहे, की धोनी एवढे कोणीही भारतीय क्रिकेटसाठी समर्पित नाही.
धोनीने मालिकेतील सिडनी येथील पहिल्या एकदिवसीय सामन्यात संथ फलंदाजी केली होती. त्याच्यावर यावरून टीका झाली होती. आधीसारखी आक्रमक फंलंदाजी धोनी करू शकत नसल्याचेही म्हटले गेले. पण अॅडलेड आणि मेलबर्न येथे धोनीने महत्वपूर्ण खेळ्या करताना भारताला विजय मिळवून दिला. ऑस्ट्रेलियातील ऐतिहासिक विजयानंतर कोहली म्हणाला, धोनीसाठी एक संघ म्हणून आम्ही आनंदी आहोत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जास्त खेळत नसतानाही धोनीने बनवलेल्या धावा त्याला आत्मविश्वास मिळवण्यासाठी महत्वाच्या आहेत.
W.O.R.D Skipper! 👏👏
Captain @imVkohli on @msdhoni #TeamIndia #AUSvIND pic.twitter.com/PkD5Q7nQQl— BCCI (@BCCI) January 18, 2019
कोहली पुढे म्हणाला, बाहेर खुप गोष्टी घडतात, धोनीबद्दल बाहेर खुप काही बोलले जाते. पण, आम्हाला माहित आहे धोनीएवढे भारतीय क्रिकेटसाठी दुसरे कोणीही समर्पित नाही. धोनीला टीकाकारांनी वेळ दिला पाहिजे. भारतीय क्रिकेटसाठी धोनीने खूप योगदान दिले आहे. धोनी भारतातील सर्वात बुद्धीमान क्रिकेटपटूंमधील एक आहे. त्याला काही सांगायची गरज पडत नाही. एक संघ म्हणून आम्ही त्याच्या कामगिरीवर खूप खूष आहोत.