मुंबई – तळीरामांच्या खिशाला नव्या वर्षांत कात्री लावणारी बातमी असून विदेशी मद्याच्या किंमती आता वाढणार आहेत. ही किंमत राज्य शासनाकडून उत्पादन शुल्कात वाढ करण्यात आल्याने वाढणार असल्यामुळे राज्याच्या तिजोरीत ५०० कोटींची भर पडणार आहे.
राज्याच्या तिजोरीवर सध्या विविध योजनांमुळे मोठा भार असल्यामुळे सरकार आपले उत्पन्नाचे स्त्रोत वाढवण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्याचाच हा भाग असल्याचे बोलले जात आहे. नुकताच राज्य शासनाने राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सातवा वेतन आयोग लागू केल्यामुळे सरकारी तिजोरीवर अतिरिक्त २४ हजार ४८५ कोटी रुपयांचा वार्षिक बोजा पडणार आहे. त्यामुळेच देशात तयार होणाऱ्या विदेशी मद्याच्या उत्पादन शुल्कात वाढ करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. सुमारे १८ ते २० टक्के वाढ विदेशी मद्याच्या उत्पादन शुल्कात करण्यात येणार असल्यामुळे राज्य सरकारच्या महसुलात वर्षाला ५०० कोटींची भर पडणार आहे.