भारतातील ८९ टक्के कर्मचारी करतात तणावखाली काम


नवी दिल्ली – अमेरिका, जर्मनी, फ्रान्स, चीन, ब्राझिल, इंडोनेशिया या देशांतील कर्मचाऱ्यांपेक्षा भारतातील ८९ टक्के कर्मचारी तणावग्रस्त असल्याचा एक अहवाल समोर आला असून हे सर्वेक्षण विमा क्षेत्रातील प्रमुख कंपनी असलेल्या सिग्नाने समोर आणले आहे. सिग्ना ३६०च्या सर्वेक्षण अहवालात ८९ टक्के भारतीय कर्मचारी तणावग्रस्त असल्याचे सांगितले असून या संदर्भातील वृत्त ‘द हिंदू’ने दिले आहे.

कामाच्या ठिकाणी असलेला दबाव आणि आर्थिक चणचण अशी दोन प्रमुख कारणे भारतात तणावाखाली असण्याची आहेत. भारतातील ८९ टक्के कर्मचारी या दोन कारणांमुळे तणावाखाली काम करतात असेही या सर्वेक्षणात समोर आले आहे. भारतातील कर्मचारी जगाच्या तुलनेत जास्त तणावात काम करतात. त्याचबरोबर आपले भविष्यात कसे होणार? हा प्रश्नही भारतीयांना मोठ्या प्रमाणावर सतावतो. आपले आरोग्य कसे चांगले राहिल? माझे कुटुंब कसे सुखात राहिल? मी माझी पत सामाजिक स्तरावर कशी सांभाळेन? काम आणि पैसा यांचे नियोजन कसे करेन? या प्रश्नांनी भारतीयांना भंडावून सोडलेले असते. त्याचमुळे त्यांच्या तणावाचे प्रमाण जगाच्या तुलनेत जास्त आहे असेही सिग्नाने म्हटले आहे.

त्याचबरोबर सिग्नाने या अहवालात भारतातील १८ ते ३४ या वयोगटातील वर्ग सर्वाधिक तणावाखाली असतो असेही नमूद केले आहे. ९५ टक्क्यांपर्यंत १८ ते ३४ या वयोगटात तणावाचे प्रमाण असते असेही या सिग्नाने स्पष्ट केले आहे. सिग्नाने हा अहवाल तयार करण्यासाठी १४ हजारांपेक्षा जास्त ऑनलाइन मुलाखती घेतल्या. या मुलाखतींमध्ये २३ देशांमधील लोक सहभागी झाले होते. ज्या भारतीयांनी या मुलाखतींमध्ये सहभाग घेतला होता त्यापैकी ७५ टक्के लोकांनी आपण तणावाखाली का असतो याची विविध कारणे दिली. काहींनी बोलण्यास नकार दिला.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment