कधीही न भेटलेल्या कुटुंबाला आयपीएस अधिकारी अस्लम खान देतात महिन्याचा अर्धा पगार


नवी दिल्ली : आजकाल आपण पैशासाठी अमुक याने तमुक माणसाचा जीव घेतला अशा आशयाच्या बातम्या वाचल्या किंवा ऐकल्या असतील. पण आम्ही आज तुम्हाला अशा एका व्यक्तीची प्रेरणादायी कहाणी सांगणार आहोत. त्या व्यक्तीने ज्याला आपण मदत करत आहोत त्याची कधीही भेट घेतलेली नाही. ही कहाणी आहे आयपीएस अधिकारी अस्लम खान यांची. आयपीएस अधिकारी अस्लम खान लुटारुंच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या एका ट्रकचालकाच्या कुटुंबाला दर महिन्याला मदत करतात.

दिल्लीत राहणारे ट्रकचालक सरदार मान सिंग यांनी खूप कष्टाने ८० हजार रुपये कमावले होते. त्यांनी ही रक्कम भाच्याच्या लग्नासाठी जमा केली होती. बऱ्याच महिन्यांनी सरदार मान सिंग पत्नी आणि तीन मुलांना भेटण्यासाठी घरी चालले होते. सरदार मान सिंग त्या रात्री रस्ता चुकले. ते रस्ता विचारण्यासाठी ट्रकमधून खाली उतरले आणि दोघा लुटारुंनी त्यांची वाट अडवली. पैसे देण्यास सरदार मान सिंग यांनी नकार दिल्यामुळे लुटारुंनी त्यांच्यावर हल्ला केला आणि पळून गेले.

सिंग जखमी अवस्थेत बराच काळ हायवेवर पडून होते. सरदार मान सिंग यांना कोणतीही मदत न मिळाल्यामुळे रक्तस्रावामुळे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांची मुले बलजीत कौर, जसमित कौर, अस्मित कौर, पत्नी दर्शन कौर आणि आई त्या रात्री शांत झोपल्या होत्या. नियतीने आपल्यासोबत केलेल्या क्रूर खेळाची त्यांना पुसटशी कल्पनाही नव्हती.

तत्यानंतर त्याच्या कुटुंबियांची दोन वेळच्या जेवणाचीही भ्रांत होती. मुलांच्या शाळेच्या फीचाही पत्ता नव्हता. त्यावेळी अचानक दिल्लीहून फोन आला. डीसीपी मॅडम (आयपीएस अधिकारी अस्लम खान) यांना आमची जगण्याची धडपड समजली. दर महिन्याला आम्हाला थोडी रक्कम देण्याचे वचन त्यांनी दिले. त्याचबरोबर तर सरकारकडून मदत मिळवून देण्याचे आश्वासनही त्यांनी दिल्याचे सरदार मान सिंग यांच्या मुलांनी सांगितले. मान सिंग यांच्या कुटुंबाला आयपीएस अधिकारी अस्लम खान दर महिन्याचा अर्धा पगार पाठवतात. महत्वाचे म्हणजे अद्याप दोघांची एकदाही भेट झालेली नाही. पण दररोज फोन करुन खान त्यांची आस्थेने चौकशी करतात.

Leave a Comment