मुंबईकरच घेतात सर्वात जास्त टेन्शन; चिंताजनक आकडेवारी सर्वेक्षणातून उघड


नवी दिल्ली – लीब्रेट या ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या सर्वेक्षणातून भारतीय महानगरांमधील बहुतांश कर्मचारी तणावाखाली आयुष्य जगत असल्याचे समोर आले आहे. मुंबई सर्वाधिक तणावाखाली काम करणाऱ्या नोकरदारांच्या यादीत पहिल्या स्थानावर असून मुंबईतील सुमारे ३१ % कर्मचारी तणावग्रस्त असल्याची चिंताजनक आकडेवारी समोर आली आहे. सर्वेक्षणातील आकडेवारीवरुन मुंबईसोबतच देशातील इतर महानगरांमधील नोकरदार वर्गदेखील तणावग्रस्त जीवन जगत असल्याचे धक्कादायक वास्तव अधोरेखित झाले आहे.

मुंबईतील ३१% नोकरदार तणावाखाली काम करतो. देशाची राजधानी असलेल्या दिल्लीचा यानंतर क्रमांक लागतो. दिल्लीतील २७ % कर्मचारी तणावग्रस्त असून बंगळुरु (१४ %), हैदराबाद (११ %), चेन्नई (१० %) आणि कोलकाता (७ %) यांचा क्रमांक लागतो. देशाच्या महानगरांमधील अनेक कर्मचारी अतिशय व्यस्त दिनक्रम, उद्दिष्ट्ये साध्य करण्यासाठी असलेला दबाव, ऑफिसमधील राजकारण, ऑफिसमध्ये जास्त वेळ थांबून करावे लागणारे काम, वरिष्ठांचे वर्तन, त्यांच्याकडून न मिळणारे प्रोत्साहन, काम आणि घर यांच्यातील असंतुलन यामुळे तणावाखाली जगत आहेत.

लीब्रेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संस्थापक सौरभ अरोरा यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेला गती देण्यात महत्त्वाची कामगिरी पार पडणारा महानगरांमधील कर्मचारी वर्ग मानसिक तणावाचा सामना करतो आहे. तणावाखाली असलेले बहुतांश लोक त्यांचे मित्र आणि कुटुंबाशी याबद्दल संवाद साधत नसल्याचे असे म्हटले. तणावाचा सामना करणाऱ्या व्यक्तींनी त्यांच्या भावना मित्र किंवा कुटुंबीयांकडे व्यक्त करण्याची गरज आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment