बिहारमधील शिक्षण


बारावीचे निकाल नुकतेच जाहीर झाले. पूर्ण देशात बारावीच्या निकालामध्ये चांगली वाढ झाली आहे. महाराष्ट्रात तर अनेक जिल्ह्यातल्या बारावीचे निकाल ९० टक्क्यांपेक्षाही चांगले लागले आहेत. या निकालामागची कारणे काय आहेत हे माहीत नाही परंतु निकालाची टक्केवारी मनाला आनंद देणारी आहे. एका बाजूला हे दृश्य असतानाच बिहारमध्ये मात्र धक्कादायक निकाल लागले आहेत. बिहारमधील विविध प्रादेशिक शालांत परीक्षा मंडळांनी घेतलेल्या परीक्षांचे निकाल ३० ते ३५ टक्के लागले असून ६५ ते ७० टक्के विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. या निकालाने तिथले विद्यार्थी कमालीचे संतप्त झाले असून जागोजाग त्यांच्या संतापाचा उद्रेक अनुभवायला येत आहे. अर्थात, या निमित्ताने त्यांनी आंदोलन केले तरी बिहारच्या बारावी परीक्षेचा निकाल असाच लागणार होता ही वस्तुस्थिती लपून रहात नाही.

गेल्या वर्षी याच बिहारमध्ये बारावीचे निकाल इतके वादग्रस्त ठरले होते की राज्यात बोर्डात पहिल्या आलेल्या विद्यार्थ्यांना अटक करून कारागृहात टाकावे लागले होते. कारण हे विद्यार्थी पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण होण्याच्या लायकीचे नव्हते. दूरचित्रवाणीवरील एका मुलाखतीमध्ये या विद्यार्थ्यांना काही सामान्य प्रश्‍न विचारले असता त्यांची घाबरगुंडी उडाली. त्यांना उत्तरे देता आली नाहीत. मग हे विद्यार्थी गुणवत्ता यादीत कसे आले असा प्रश सर्वांनाच पडला आणि अधिक चौकशी केली तेव्हा या विद्यार्थ्यांच्या उत्तर पत्रिका काही शिक्षिकांनीच लिहिल्या होत्या असे लक्षात आले. म्हणजे बिहारमधले तेव्हाचे चांगले निकाल हे परीक्षेत होणार्‍या कॉपीमुळे चांगले लागत होते. परंतु या वर्षी मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी कॉपीमुक्त परीक्षांचे अभियान हाती घेतले.

हे अभियान अधिक कडकपणे राबवण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांना कॉप्या करणे मुश्किल झाले. कॉपीचा आधार न घेता उत्तीर्ण होण्याची क्षमता त्यांच्यात नव्हतीच. त्यामुळे त्यांना उत्तरे लिहिता आली नाहीत आणि त्यामुळे ३० ते ३५ टक्के निकाल लागला. हा निकाल कमी असला तरी तो सार्थ निकाल आहे आणि नापास झालेल्या विद्यार्थ्यांना आपली खरी औकात काय आहे हे त्याच्यामुळे समजले आहे. म्हणजे कॉपीमुक्त अभियान राबवून खर्‍या अर्थाने मुलांच्या अभ्यासाचे मुल्याकंन करायला लागताच बिहारमधल्या शिक्षणाचा दर्जा आणि विद्यार्थ्यांची क्षमता यावर असा झगझगीत प्रकाश पडला आहे.

Leave a Comment