रेल्वेतील खाद्याचे दर


प्रदीर्घ काळचा प्रवास करणारे वरच्या वर्गातले प्रवासी रेल्वेमध्ये जेवण करतात. त्याशिवाय काही पर्यायही नसतो. जेवण झाले की एक विशिष्ट कर्मचारी जेवणाचे बिल गोळा करतो आणि हे प्रवासी तो सांगेल तेवढे पैसे निमूटपणे देतात. आजपर्यंत तरी कोणी आपण देत असलेले हे पैसे योग्य आहेत की नाही याचा विचारही केला नसेल. परंतु गेल्या आठवड्यात एका जागरूक प्रवाशाची या संबंधातील पोस्ट व्हायरल झाली. आपण ज्या जेवणाला १५० रुपये देतो त्या जेवणाची खरी किंमत केवळ ५० रुपये आहे हे कित्येक प्रवाशांना माहीत नव्हते. त्यामुळे सरसकट प्रत्येक जेवणामागे १०० रुपये अवाजवी घेतले जात होते. प्रवास करणारा माणूस खिशात पैसे घेऊनच प्रवास करत असतो आणि रेल्वेच्या बाहेर कोणत्याही बर्‍यापैकी हॉटेलात जेवण केल्यास साधारणतः १२५ ते १५० रुपये लागतातच.

त्यामुळे आपल्याकडून १५० रुपये घेतले जातात हे अवाजवी आहेत याचा कोणी विचार केला नव्हता. ही पोस्ट व्हायरल झाल्यापासून मात्र लोक जागरूक झाले आणि त्यांनी तक्रारी करायला सुरूवात केली. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने आता अधिकृत दर जाहीर केले आहेत आणि शाकाहारी जेवण ५० रुपयाला तसेच मांसाहारी जेवण ५५ रुपयाला असल्याचा खुलासा केला आहे. चहा प्यायल्यानंतर प्रत्येकजण सहजच खिशातून दहा रुपये काढून देतो. पण चहाची किंमत ७ रुपये आहे असे आता स्पष्ट करण्यात आले आहे. यापुढे लोक जागरूकपणे वागतील आणि केटरिंग सेवा देणार्‍या कर्मचार्‍याला जेवण झाल्यानंतर ५० रुपये देऊन बोळवतील. परंतु आजपर्यंत अशा प्रकारे १०० रुपये जास्त घेऊन किती रुपयांचा काळा बाजार केला गेला याचा अंदाज घेतला तर रेल्वेचे प्रवासी आजवर करोडो रुपयांना लुटले गेले आहेत असे लक्षात येईल.

चहाचा दर ७ रुपये, पाण्याची बाटली १५ रुपये, उपहार ३० रुपये, मांसाहारी उपहार ३५ रुपये, शाकाहारी जेवण ५० रुपये आणि मांसाहारी जेवण ५५ रुपये असे दर आहेत. याची जाणीव आता लोकांनी ठेवण्याची गरज आहे. ३० रुपयांच्या न्याहरीमध्ये काय काय असावे? जेवणात कोणकोणते पदार्थ असावेेत आणि ते किती असावेत याचे सर्व तपशील रेल्वे प्रशासनाने घोषित केले आहेत. रेल्वेने हा खुलासा करताना लोकांना एक आवाहन केले आहे, की यापेक्षा अधिक पैसे मागण्याचा अट्टाहास केल्यास त्याच्याविरुध्द प्रवासी रेल्वे प्रशासनाविरुध्द तक्रार करू शकतात.

Leave a Comment