सिवान का शेर


राजकीय पक्ष आणि गुंडांना मिळणारे संरक्षण हा विषय आताच्या महानगरपालिका निवडणुकांत चांगलाच गाजत आहे. नेमक्या याच काळात देशातला सर्वात गुंड राजकीय नेता महंमद शहाबुद्दीन हा जवळ जवळ आजन्म कारावासासाठी दिल्लीच्या तिहार कारागृहात दाखल झाला आहे. त्याच्यावर एवढे गंभीर स्वरूपाचे ५० गुन्हे दाखल आहेत की त्या सर्वांची शिक्षा झाल्यास त्याला आता मरेपर्यंत तुरुंगातच दिवस काढावे लागतील. तो तसा २००७ पासून बिहारातल्या कारागृहात होता. तो राहणारा सिवान या गावचा असल्याने त्याच्या कारावासातले पहिले काही दिवस त्याला सिवानच्या तुरुंगात काढावे लागले. नंतर मात्र त्याल पाटण्याच्या तुरुंगात रहावे लागले. पाटण्याचा असो की सिवानचा असो पण बिहारातला कोणताही तुरुंग त्याला घरच्या सारखा वाटत असे. तिथे असूनही तो घरच्यासारखे जीवन व्यतित करीत असे. अगदी त्याचा जनता दरबारही तिथे भरत असे. तो तुरुंगात असतानाही लोकसभेवर निवडून आला होता. पण २००९ साली त्याला निवडणूक आयोगाने निवडणूक लढवायला बंदी केली. त्यावर त्याने आपल्या पत्नीला उभे केले. ती मात्र पराभूत झाली.

या निवडणुकीत तिचा पराभव ओम प्रकाश यादव याने केला पण निवडणुकीनंतर यादवच्या नऊ सहकार्‍यांचे खून झाले. आपल्या विरोधात कोणी आवाज जरी काढला तर तो जिवंत राहणार नाही हे आपले शब्द त्याने खरे केले. पण त्यातल्याच एका प्रकरणात त्याला आजीवन कारावासाची सजा झाली. ती पाटण्याच्या कारागृहात भोगत असतानाच त्यांचा कारभार चांगला चाललेला होता. बिहारचे पोलीस त्याला फार घाबरतात. कारण तो लालूप्रसाद यादव यांचा आवडता चेला आहे. स्वत: लालूजी तुरुंगात जाऊन आलू खाऊन आले आहेत. त्यामुळे ते आपल्या या चेल्याला फार सांभाळतात. ते कोणत्याही क्षणी बिहारचे मुख्यमंत्री होऊ शकतात. तेव्हा आज आपण त्यांच्या या आवडत्या चेल्याला दुखावले तर पुढे आपले काय होईल याची भीती पोलिसांना भेडसावत असते. म्हणूनच शहाबुद्दीनचा तुरुंगातला कारभारही सुखाने चालू शकतो. इतर राजकीय नेत्यांप्रमाणेच शहाबुद्दीनही अधुन मधुन आजारी पडतो आणि तुरुंगाच्या ऐवजी रुग्णालयात दाखल होतो. तिथे रुग्णालयाचा एक पूर्ण मजला त्याच्यासाठी राखीव असतो आणि तिथे पोलिसांंनाही प्रवेश नसतो. एखाद्या पोलीस अधिकार्‍याला प्रवेश हवा असेल तर शहाबुद्दीनच्या खाजगी गार्डांची अनुमती घेऊन आता जाऊन या सरकारी महेमानला भेटता येते. अशा थाटात त्याचा तुरुंगवास जारी असतो.

अलीकडे त्याचा वचक कमी होत गेला कारण मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी राज्यातल्या अशा गुंडगिरीला पायबंद घालण्याचा निर्धारच केला. परिणाम असा झाला की, असले राजकीय गुंड ताळ्यावर आले. त्यांना आता आता कोणी घाबरेनासे झाले असून त्याच्यावर लहान सहान कृत्याच्या संदर्भात खटले दाखल करायला लागले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून त्याच्या या शाही तुरुंगवासाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल झाले. त्याला दिल्लीच्या तिहार कारागृहात हलवण्यात यावे अशी मागणी या अपिलात करण्यात आली. ती मान्य करून सर्वोच्च न्यायालयाने त्याला तिहार कारागृहात बंद करण्याचा आदेश दिला. तिहारमध्ये त्याचा जनता दरबार बंद होईल. कारण तिहार जेल काही बिहारात नाही. त्याच्या या तिहार यात्रेचा त्याच्या मनावर परिणाम झाला आहे. अन्यथा असे गुंड कितीही शिक्षा झाल्या तरीही चेहर्‍यावर बेदरकारी दाखवत असतात आणि आपण कोणत्याही तुरुंगात घातले तरीही आझादच आहोत अशी भाषा वापरत असतात. तिहारमधील कारावासाने शहाबुद्दीनचा खेळ जवळ जवळ खलास झाला आहे. हे त्याच्या वागण्यावरून लक्षात आले.

त्याला या तुरुंगात आणण्यात आले तेव्हा त्याच्या चेहर्‍यावर भेदरल्याचे भाव उमटलेच पण त्याच्या घशाला कोरड पडली. बिहारमध्ये तो तुरूंगात होता तरीही तुरुंगाची हवा काय असते हे त्याला माहीत होत नव्हते. पण आता तिहार मध्ये आल्यावर त्याला तुरुंगाची हवा काय असते हे कळले. तिथे पोचताच तो पाणी मागून घेऊन तीन चार ग्लास पाणी प्याला एवढी त्याच्या घशाला कोरड पडली होती. शहाबुद्दीन राजकारणातल्या गुंडगिरीचा एक नमुना आहे. १९९० पासून त्याने कितीतरी खून पाडले आहेत. इतर गुन्हे तर त्याच्यावर डझनांनी आहेत पण त्याच्या या अपराधांवर लालूंच्या जंगलराजमध्ये सरकारी पांघरूण घातले जात होते. लालूंची सद्दी संपताच शहाबुद्दीनचाही वट्ट संपला. आता तो मेणाहून मऊ होण्याच्या बेतात आहे. राज्यातल्या मुख्यमंत्र्यांनी मनावर घेतले तर असे गुंड आणि गुरकावणारे शेर हे मांजरासारखे मऊ होऊन म्याव म्याव करायला लागतात. लालू राज संपल्यानंतर नितीश कुमार भाजपाच्या मदतीने मुख्यमंत्री झाले आणि तिथून शहाबुद्दीनच नाही तर खुद्द नितीश कुमार यांच्या पक्षाशी संबंधित असलेल्या काही गुंडांनाही नितीश कुमार यांनी आत टाकले. राजकीय गुंडगिरी राजकारणी मंडळीच्याच आशिर्वादाने फैलावत असते आणि त्यांनी मनावर घेतले तर अशा गुंडांचे जगणे मुष्कील होऊन ते छान वागायला लागतात. नितीशकुमार यांनी ते दाखवून दिले. लालू प्रसाद यांनी याच गुंडाला तीनदा आमदार आणि दोनदा खासदार केले पण नितीश कुमार यांनी मनावर घेताच शहाबुद्दीनसह अनेक गुंडांची बोबडी वळली आहे.

Leave a Comment