वजन कमी करायचे आहे. जास्त उष्मांक असलेले पदार्थ खायचे नाहीत पण सायंकाळी ७.३० च्या सुमारास खूप भूक तरी लागलेली आहे. मग पोटाची सोय काय करावी? पोटाची तर सोय झाली पाहिजे पण सुटलेल्या पोटाचा आकारही वाढता कामा नये. अशा प्रसंगी काहीही न खाणे फार घातक ठरते. पण उपाशी रहायचे नाही म्हणून हाती पडेल तेही काही खाऊन चालणार नाही. अशा वेळी डायटिंग करणारांना आहारतज्ज्ञ काही अशा पदार्थांची शिफारस करीत असतात की ज्यामुळे पोटही भरेल आणि वजनही वाढणार नाही.
अशा वेळी चांगले निवडलेले १५ बदाम खावेत. त्यामुळे पोटही भरेल आणि कॅलरीज वाढणार नाहीत. साधारणत: १५ बदामांनी ९८ कॅलरीज मिळतात. तो सुकामेवा असला तरीही त्यात स्निग्धांश कमी असतात. कॅलरीज मर्यादित ठेवून भूक भागवणारे आणि पौष्टिक असे खाद्य म्हणजे सफरचंद. एका मध्यम आकाराच्या सफरचंदात केवळ १०० उष्मांक असतात.
आयुर्वेदात शेंगादाण्यांना घातक मानले जाते पण काही तज्ज्ञ भुकेच्या वेळी मुठभर शेंगादाणे खाणे गैर मानत नाहीत. एवढ्या दाण्यांनी केवळ ४८ उष्मांक मिळत असतात. फळांमध्ये द्राक्षे आणि टरबूज ही दोन फळे अशा भुकेला फारच चांगली असतात. त्यांच्यातही अनेक पोषण द्रव्ये असूनही कॅलरीज कमी असतात. या वेळेला आणखी एक चांगले खाद्य म्हणजे टोमॅटो सूप.