मोदींच्या महत्त्वाकांक्षी मेक इन इंडिया मोहिमेला बनावट उत्पादनांचा मोठा धोका होऊ शकतो असा इशारा ऑथेटिकेट सोल्युशन प्रोव्हायडर असोसिएशनचे अध्यक्ष यु.के. गुप्ता यांनी असो.च्या गोव्यात पार पडलेल्या वार्षिक बैठकीत बोलताना दिला आहे.
यावेळी बोलताना ते म्हणाले, मेक इन इंडिया योजना जेव्हा भारतात उत्पादित झालेल्या वस्तूंच्या दर्जा व गुणवत्तेबाबत ग्राहकाला खात्री वाटेल तेव्हाच सफल समजता येईल. त्यासाठी होलोग्राम व टेंपरप्रूफ सील असे साधे सोपे आणि स्वस्त उपायही पुरेसे आहेत. भारतात उत्पादित झालेल्या वस्तूंचा दर्जा कायम राखणे हे फार महत्त्वाचे असून ग्राहकांसाठी सर्वोच्च गुणवत्ता विश्वास ही महत्त्वाची बाब आहे. फिक्कीचा हवाला देऊन ते म्हणाले २०१३-१४ मध्ये बनावटी मालाने पॅकेज उत्पादन कंपन्यांना मोठे नुकसान झाले होते. एफएमसीजी कंपन्यांना बनावट पॅकेजमुळे २१९५७ कोटींचे नुकसान झाले होते तर एफएमसीजी, मोबाईल, अल्कोहोल, तंबाकू, वाहन सुटे भाग, संगणक हार्डवेअर उत्पादक कंपन्यांना १.०५,३८१ कोटींचे नुकसान झेलावे लागले.
देशातील ७० प्रमाणसमाधान प्रदाता कंपन्या या असोसिएशनच्या सदस्य आहेत असे सांगून गुप्ता म्हणाले, आमच्या असो.ला इंटरनॅशनल होलोग्राम मॅन्यूफॅक्चरिंग असो. व सीबीआय तसेच इंटरपोलची मान्यता आहे.ही संस्था जगभरातील १० हजारांहून अधिक खरया ब्रँडच्या उत्पादनांची सुरक्षितता सांभाळते.यामुळे बनवाट मालावर नियंत्रण मिळविणे शक्य होते तसेच अबकारी शुल्कात २० टक्के वाढही नोंदविण्यास त्याची मदत मिळते.