बारावीचे निकाल वेळेवरच

hsc
मुंबई : राज्य सरकारकडून प्रदीर्घ काळापासूनच्या प्रलंबित मागण्यांबाबत मिळालेल्या आश्वासनानंतर ज्युनिअर कॉलेज शिक्षकांनी बारावी बोर्डाच्या पेपर तपासणीवरील बहिष्कार मागे घेतला असून विनाअनुदानित शाळांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीबाबत लेखी आश्वासनच हवे, अशी ठाम भूमिका घेत, दहावीच्या पेपर तपासणीवरील बहिष्कार कायम राहील, असे शिक्षकांनी जाहीर केले आहे. राज्यातील ज्युनिअर कॉलेजातील शिक्षकांची संचमान्यता व नियुक्ती तातडीने करा, शिक्षण सेवक योजना रद्द करा आदी विविध १३ मागण्यांच्या पूर्ततेसाठी कॉलेज शिक्षकांनी पेपर तपासणीबाबत असहकाराचा पवित्रा घेतला होता.

बारावीच्या पेपर तपासणीवरील बहिष्कार मागे घेण्यात आल्याने या महत्त्वाच्या परीक्षेचा निकाल वेळेवर लागेल, असे स्पष्ट झाले आहे. राज्यातील ज्युनिअर कॉलेजातील शिक्षकांची संचमान्यता व नियुक्ती तातडीने करावी, शिक्षणसेवक योजना रद्द करावी, २४ वर्षे सेवा झालेल्या सर्व शिक्षकांना विनाअट निवडश्रेणी द्यावी यासह एकूण १३ मागण्या गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. त्याकडे लक्ष वेधण्यासाठी ज्युनिअर कॉलेज शिक्षक महासंघाने बारावी पेपर तपासण्याबाबत असहकार आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानुसार आंदोलन सुरूही झाले होते. अखेर शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विधिमंडळात ​दिलेल्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेतल्याची घोषणा महामंडळाचे प्रा. अनिल देशमुख यांनी केली. शनिवारपासून आपण वेळेवर पेपर तपासणार असून बारावीच्या विद्याथ्र्यांचे निकाल वेळेवर लागतील, असे त्यांनी सांगितले.

Leave a Comment