
इराक आणि सिरीयात इस्लामिक स्टेट स्थापन केलेल्या दहशतवाद्यांनी मोसुल शहराजवळ तुर्की कंपनीत बांधकाम मजुर म्हणून काम करत असलेल्या ४० मजुरांचे जूनच्या मध्यात अपहरण करून त्यांना गोळ्या घातल्या असल्याचे वृत्त एका वृत्तवाहिनीने दोन बांग्लादेशी मजुरांचा हवाला देऊन दिले आहे. भारतीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने मात्र या संदर्भातली खात्री पटवून घेतली जात असल्याचा खुलासा केला आहे.
इसिसकडून ४० भारतीय मजुरांची हत्या?
मिळालेल्या माहितीनुसार या दहशतवाद्यांच्या तावडीतून शिताफीने सुटका करून घेतलेल्या हरजितने ही माहिती दोन बांग्लादेशी मजुरांना दिली आहे. हरजितच्या म्हणण्यानुसार ५१ बांग्लादेशींसह कांही भारतीय बांधकाम मजुरांचे इसिसने जूनमध्ये अपहरण केले. हरजितचेही अपहरण करण्यात आले होते. या सर्व मजुरांना अरबिलना नेण्यात येणार असल्याचे सांगून त्यांची दोन गटात विभागणी करण्यात आली होती. त्यातील बांग्लादेशी वेगळे काढण्यात आले. सर्वांचे पासपोर्ट आणि मोबाईलही जप्त करण्यात आले होते. पूर्ण दिवसभरात केवळ एक भाकरी या मजुरांना खाण्यासाठी देण्यात येत होती. नंतर त्यातील ४१ भारतीयांना पहाडी भागात नेण्यात आले व तेथे त्यांना गोळ्या घातल्या गेल्या.
यात हरजित यालाही दोन गोळ्या लागल्या होत्या. मात्र हरजितने मेल्याचे नाटक केले आणि स्वतःची सुटका करून घेतली असे त्याचे म्हणणे आहे.
