मुंबई – पहिल्या मेट्रोपाठोपाठ चारकोप-वांद्रे-मानखुर्द या मार्गावर दुसरी मेट्रोही सुरू होईल हे ऑगस्ट-२००९मध्ये दाखवलेले स्वप्न गेल्या काही काळात धूसर होत अखेर विरले. मेट्रो-२च्या कामाचे टेंडर मिळालेली रिलायन्स कंपनी आणि राज्य सरकार यांनी ’नो कॉस्ट ऍण्ड नो क्लेम्स’ या तत्त्वावर हा करार रद्द केला असून, आता मुंबईकरांना या मार्गावर मेट्रो येण्यासाठी किमान पाच वर्ष थांबावे लागणार आहे. रिलायन्सने या प्रकल्पासाठी जिओटेक्निकल सर्व्हेही केला. परंतु, चारकोप येथील कारडेपोचा प्रश्न त्यानंतरच्या पाच वर्षांत सुटलाच नाही. या प्रकल्पासाठी मानखुर्द आणि चारकोप या दोन्ही ठिकाणी कारडेपोसाठी केंद्राची परवानगी मिळत नसल्याने अखेर एमएमआरडीएने मानखुर्द येथे पर्यायी जागा शोधली. कारडेपोसाठी राज्य सरकारच्या ताब्यातील तुर्भे-मंडाला येथील जागा निश्चिशत करण्यात आली. तसेच, मेट्रो-२ दहिसरपर्यंत नेण्याचे ठरवून चारकोप येथील कारडेपोचा प्रश्नही निकालात काढला होता. मात्र, असे असतानाही २००९मध्ये करण्यात आलेला हा करारच रद्द करण्यात आल्याने हा प्रकल्प आणखी लांबणीवर पडणार आहे.