
दूबई – पुढील वर्षी ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेत आयसीसीने काही महत्वपूर्ण बदल केले असून यावेळेच्या स्पर्धेत आयसीसीने सूपर ओव्हरचा वापर न करण्याचा निर्णय घेतला असून कोणीही विजेता न झाल्यास विजेत्याची रक्कम विभागून दिली जाणार आहे. याचबरोबर अंतिम सामन्याच्या वेळेस पाऊस आणि अन्य कारणास्तव सामना होऊ शकला नाही तर राखीव दिवसही ठेवण्यात येणार नसल्याने दोन्ही संघांना संयुक्त विजेते घोषित केले जाईल. त्याचबरोबर विश्वचषकामधील सर्व ४९ सामन्यात डीआरएस (डिसीजन रिव्हय़ू सिस्टीम) लागू करण्यात येणार असल्याचा निर्णय देखील यावेळी आयसीसीने घेतला आहे.
विश्वचषक स्पर्धेतून सुपर ओव्हर आउट
दुसरी कडे आयसीसी क्रिकेट विश्वचषक २०१५ची मुहूर्तवेढ निश्चित झाल्यानंतर अवघ्या १२ मिनिटांमध्ये २० हजार तिकिट विकले गेले. विकले गेलेले हे २० हजार तिकिट खरेदी करणारे सर्व भारतीय क्रिकेट चाहते असल्याची माहिती ऑस्ट्रेलियाच्या प्रशासनाने दिली आहे.
१५ फेब्रुवारी २०१५ला भारत विरूद्ध पाकिस्तानचा सामना ऑस्ट्रेलियाच्या एडिलेड ओवल मैदानावर रंगणार आहे. भारत विरूद्ध पाकिस्तानचा सामना हा भारतीय तसेच पाकिस्तानच्या नागरिकांसाठी खूप उत्सुकतेचा असतो. या खेळाची तिकिट विक्री सुरू झाल्यानंतर अवघ्या १२ मिनिटांत २० हजार भारतीय क्रिकेट चाहत्यांनी आपले तिकिट बुक केले.
