
मुंबई – राज्यात स्थापन झालेले भाजपचे अल्पमतातील सरकार बहुमताअभावी पडू नये, त्याचबरोबर राज्यातील जनतेला स्थिर सरकार हवे असल्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसने भाजपला पाठिंबा देऊ केल्याचे पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुनरुच्चार केला आहे. शरद पवार यांनी यावेळी असे देखील स्पष्ट केले की भाजपला प्रत्येक मुद्यावरच पाठिंबा देऊ, असा त्याचा अर्थ होत नाही.
सरकार पडू नये म्हणून भाजपला पाठिंबा – शरद पवार
शिवसेनेने भाजपला पाठिंबा दिला तर आम्हाला आनंदच होईल, मात्र, जर भाजपला शिवसेनेने पाठिंबा दिला नाही तर राज्याला पुन्हा निवडणुकीला सामोरे जाण्याची वेळ येऊ नये म्हणून भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय राष्ट्रवादीने घेतल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे.
आम्ही कोणाला मतदान करावे, असा सल्ला अन्य पक्षांनी आम्हाला देऊ नये, असे सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा नामोल्लेख न करता शरद पवार यांनी टोला लगावला आहे. रविवारी शिवसेना पक्षप्रमुख यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीवर केलेल्या टिकेचाही शरद पवार यांनी खरपूस समाचार घेतला.
