
परळी – भाजप नेते आणि केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांचे अपघाती निधन झाले असले तरी, यामागे घातपात असल्याचा बीडमधील जनतेला संशय आहे . त्यातूनच आपल्या लाडक्या नेत्याला जड अंतकरणाने शेवटचा निरोप दिल्यानंतर मात्र कार्यकर्त्यांचा ,लाखो नागरिकांचा संयम सुटला आणि त्यांनी अपघात की घातपात असा संशय व्यक्त करीत मंत्र्यांनाच लक्ष्य केले. सीबीआय तपास झालाच पाहिजे असा आक्रोश करीत मंत्र्यांच्या गाड्यांना रोखून धरले.यावेळी पोलिसही हतबल बनले होते.
एकच आक्रोश … घातपात की अपघात ,मंत्र्यांना केले लक्ष्य
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आर.आर.पाटील, जयंत पाटील यांच्या गाडयांना घेराव घालत संतप्त जनतेने मुंडे यांच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची गाडी जमावाने गाडी अडवून धरत धक्काबुकी केली. काही नेत्यांच्या गाडीवर दगडफेकही करण्यात आली.हर्षवर्धन पाटील ,राज ठाकरे ,छगन भुजबळ ,जयंत पाटील या नेत्यांना जाण्यासही भावनिक झालेल्या जनतेने जाण्यास मार्ग दिला नाही. काल अपघात झाल्यानंतर भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघ यांनी गोपीनाथ मुंडें यांचा मृत्यू हा काही कुणी सामान्याचा मृत्यू नाही. संशयास्पद अशा या घटनेची सीबीआय चौकशी व्हावी अशी महाराष्ट्र भाजपच्यावतीने मागणी केली होती तसेच भाजपचे आमदार आणि मुंडेचे विश्वासू प्रकाश (अण्णा) शेंडगे यांनीही चौकशी व्हावी, असे म्हटले आहे.यासंदर्भात शेंडगे यांनी म्हटले आहे कि ,दिल्लीत सकाळी सहाच्या सुमारास फारशी गाड्यांची वर्दळ नसते. अशावेळी हा अपघात झाल्याने मनात संशय येतोच. त्यामुळे या अपघाताची सखोल चौकशी व्हावी. असे म्हटले आहे.या पार्श्वभूमीवर बुधवारी परळीमध्येही हाच सवाल करून जनतेने सीबीआय तपासाची मागणी करण्यासाठी मंत्र्यांसह राजकीय नेत्यांना धारेवर धरले.
