नवी दिल्ली – नुकत्याच झालेल्या चार राज्यांच्या निवडणुकीत मोठा पराभव स्वीकारावा लागलेल्या काँग्रेसला आगामी लोकसभा निवडणुकीत दोनअंकीच जागांवर समाधान मानावे लागेल, असे भारतीय जनता पक्षाचे (भाजप) ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी म्हटले आहे.
अडवाणी यांनी आपल्या ब्लॉगवर लिहिले आहे, की चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा झालेला पराभव हा आणीबाणीनंतरचा दुसरा मोठा पराभव आहे. मतदारांनी त्यांना सर्वच पातळ्यांवर नाकारले आहे. राजस्थानमध्ये त्यांना मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. भ्रष्टाचार, महागाई, काळापैसा इत्यादी मुद्द्यांमुळे काँग्रेसला आगामी लोकसभा निवडणुकीत मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागणार आहे.
संपूर्ण देशातून त्यांना दोनअंकापेक्षा अधिक जागा मिळाल्यास आश्चर्य वाटणार नाही.” निवडणुकीचा एक अध्याय संपला असून, आणखी सोनिया गांधी आणि डॉ. मनमोहन सिंग यांच्या सरकारचा निर्णय व्हायचा आहे, असे अडवाणी यांनी सांगितले.