नवी दिल्ली – पाकिस्तान माझ्या हयातीत भारताविरुद्ध कुठले युद्ध जिंकण्याची अजिबात शक्यता नाही, अशी परखड ग्वाही आज पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी दिली. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी दिलेल्या इशार्यावर सिंग यांनी ही प्रतिक्रिया दिली.
काश्मीर मुद्द्यावरून भारत आणि पाकिस्तानमध्ये चौथे युद्ध होऊ शकते, असा इशारा शरीफ यांनी काल दिला. त्याबाबतचे वृत्त पाकिस्तानमधील एका आघाडीच्या दैनिकात प्रसिद्ध झाले आहे. त्याबाबत आज पत्रकारांनी विचारल्यावर सिंग यांनी वरील शब्दांत भारताच्या क्षमतेबाबत ठाम विश्वास व्यक्त केला.
दरम्यान, शरीफ यांनी युद्धाबाबतचा इशारा दिलाच नाही, असा खुलासा त्यांच्या कार्यालयाकडून करण्यात आला आहे. शरीफ यांच्या वक्तव्याबाबतचे वृत्त निराधार आणि चुकीचे आहे. भारत आणि पाकिस्तानमधील कुठल्याही मुद्द्यावर शांततामय मार्गाने तोडगा निघावा असेच शरीफ यांचे मत असल्याचे त्यांच्या कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.