नागपूरात जीवनदायी आरोग्य योजनेचे लोकार्पण

नागपूर – आई ज्याप्रमाणे आपल्या मुलांच्या आरोग्याची काळजी घेते, त्याप्रमाणे राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना राज्यातील प्रत्येक कुटुंबातील व्यक्तींची काळजी घेणारी योजना आहे. या योजनेचा महिला व बालकांसोबतच प्रत्येक व्यक्तींनी लाभ घ्यावा, असे आवाहन राष्ट्रीय सल्लागार परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी यांनी आज केले.
कस्तुरचंद पार्कच्या भव्य मैदानावर विशाल जनसमुदायाच्या उपस्थितीत सामान्य नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणार्‍या महाराष्ट्र शासनाच्या राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचा लोकार्पण सोहळा श्रीमती सोनिया गांधी यांच्या हस्ते पाड पडला. प्रारंभी श्रीमती गांधी यांनी योजनेचा शुभारंभ करुन या योजनेतील लाभार्थ्यांना आरोग्य स्वास्थकार्डाचे वाटप केले. तसेच राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेअंतर्गत लाभ मिळालेल्या 78 लाभार्थ्यांशी भेट घेऊन त्यांच्या आरोग्याची आस्थेने चौकशी केली. राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेच्या लोकार्पण सोहळ्यास मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, केंद्रीय अवजड उद्योगमंत्री प्रफुल्ल पटेल, खासदारद्वय विलास मुत्तेमवार, मुकुल वासनिक, राज्याचे आरोग्य मंत्री सुरेश शेट्टी, पालकमंत्री शिवाजीराव मोघे, रोजगार हमी योजना मंत्री डॉ.नितीन राऊत, अन्न व नागरी पुरवठा मंत्री अनिल देशमुख, आरोग्य राज्यमंत्री प्रा.फौजिया खान, मोहन प्रकाश, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष माणिकराव ठाकरे मंचावर उपस्थित होते.
संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीस बलिदान देणार्‍या शहीदांना अभिवादन करुन श्रीमती सोनिया गांधी पुढे म्हणाल्या, शरीर आणि मन स्वस्थ राहाणे आवश्यक आहे. आरोग्याच्या मुलभूत सुविधा बालकांना व महिलांना देण्यासाठी केंद्र व राज्यशासन कटीबद्ध असून समाजातील शारीरिक दुर्बल घटकांना आरोग्यविषयक सुविधांचा लाभ देऊन त्यांचे मनोबल आणि मनोधैर्य कायम ठेवण्यासाठी राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना अत्यंत महत्वपूर्ण असल्याचे त्यांनी सांगितले.
शासन ग्रामीण आणि शहरी भागातील सर्व आरोग्यविषयक सुविधांच्या सुधारणेकडे विशेष लक्ष देत असून पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी हे सामान्य नागरिकांच्या कल्याणाच्या सर्व कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करीत असल्याचे सांगतांना श्रीमती सोनिया गांधी म्हणाल्या की, सर्वसामान्य जनतेला होणारा आरोग्य विषयक त्रास हा केवळ त्या कुटुंबापुरता मर्यादित नसून त्याचा त्रास संपूर्ण कुटुंबाला सहन करावा लागतो. त्यामुळेच राजीव गांधी जीवनदायी योजनांची सुरुवात केली आहे. गरीब जनतेला आरोग्यविषयक उपचारासाठी असंख्य अडचणींना सामारे जावे लागते. त्यासाठी स्वत:कडील घर, जमीन विकावी लागते. कर्ज घ्यावे लागते तर प्रसंगी आरोग्यावरील खर्चामुळे मुलांचे शिक्षणसुद्धा पूर्ण करणे शक्य होत नाही. त्यामुळे ही योजना सर्वसामान्यांसाठी दिलासा देणारी असल्याचेही श्रीमती गांधी यांनी यावेळी सांगितले.
जीवनदायी आरोग्य योजना ही सर्व शासकीय व खाजगी रुग्णालयामध्ये लागू करण्यात आली असून रुग्णांना या योजनेमध्ये सर्वप्रकारच्या शस्त्रक्रियेसह मोफत औषध, भोजन तसेच घरी येण्याजाण्यासाठी रेल्वे किंवा बसचे भाडेही दिल्या जाणार आहे. महिलांनी आपले आजार यापुढे केवळ सहन न करता तसेच दुर्धर आजारामध्ये आपले प्राण न गमावता राजीव गांधी जीवनदायी योजनेचा लाभ घ्यावा. एक अंधेरा था अब नये रोशनीमे बदल जायेगा हा आत्मविश्वास बाळगावा, असे आवाहन त्यांनी संपूर्ण महिलांना यावेळी केले.

Leave a Comment