पंतप्रधान म्हणतात,विकासदर 6.5 टक्के गाठणे अशक्य

नवी दिल्ली- गुंतवणूक वाढवण्यासाठी सरकारने घेतलेल्या उपाययोजनांचा परिणाम आगामी काळात नक्कीच दिसून येईल असा विश्‍वास व्यक्त करतानाच अस्थिर जागतिक अर्थव्यवस्थेमुळे फेब्रुवारीपर्यंत विकासदर 6.5 टक्के गाठणे अशक्य असल्याचे मत पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी व्यक्त केले. पुढील 2013-14 या आर्थिक वर्षांत विकास दर काय असेल यासंदर्भात आता काही सांगता येणं अशक्य आहे.कारण आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनेही भारतासह सर्व देशांचा विकास दर घटण्याची शक्यता वर्तवली आहे. अर्थसंकल्पामध्ये विकासह दर 6.5 टक्के असेल अशी शक्यता व्यक्त करण्यात आली होती.मात्र हा विकास दर 6.5 टक्क्यांपेक्षाही खाली असेल असे चित्र सध्यातरी दिसत आहे.

यंदाच्या वर्षी पाऊस चांगला झाल्याने कृषी विकासदरात सुधारणा होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. कृषी क्षेत्रात हळूहळू होणारा विकास हे चांगले संकेत असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे. खाणक्षेत्र आणि उत्पादन क्षेत्राचा विकास दर घटल्याने यावर्षी आर्थिक विकास दराने गेल्या दहा वर्षांतील पाच टक्क्यांच्या सर्वात निचांकी पातळीला स्पर्श केला. 2004 ते 2012 या आठ वर्षांच्या काळात विकासदराने 8.2 टक्के लक्ष्य गाठले होते. त्याच्या तुलनेत चालू आर्थिक वर्षात ढासळलेला विकास दर ही चिंतेची बाब असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.