पवार,चव्हाण यांच्याकडून अपेक्षाभंगच – उद्धव ठाकरे

कुडाळ – अनेक वर्षापासून केंद्रात मंत्री असलेल्या शरद पवार यांनी कृषिमंत्री म्हणून राज्यासाठी काहीच केले नाही. तर दुसरीकडे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे भष्टाचार करीत असलेल्या मंडळींना पाठीशी घालत आहेत. या दोघांनीही आमचा अपेक्षाभंगच केला असल्याचा आरोप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी कुडाळ येथील सभेत केला.जैतापूरसारखा विनाशकारी प्रकल्प या कोकणावर सरकारने लादला आहे. तो आम्ही कदापि होऊ देणार नसल्याचा इशाराही ठाकरे यांनी यावेळी दिला.

पुढे बोलताना ठाकरे म्हणाले, ‘ गेल्या काही दिवसपासून विकासाच्या फसव्या घोषणा करून जमिनी बळकावण्याचे काम कोकणात सुरू आहे. कधी सी वर्ल्ड तर कधी चिपी विमानतळाच्या घोषणा करत फक्त जमिनी बळकावण्याचे काम उद्योगमंत्री नारायण राणे करत आहेत . मात्र त्याचे असले उद्योग यापुढे शिवसेना चालू देणार नाही . यापुढे त्यांचे असले प्रकार शिवसेना खपवून घेणार नाही.’

राज्य सरकार जैतापूरसारखा विनाशकारी प्रकल्प कोकणावर लादण्याचा प्रयत्न करीत आहे . मात्र हा प्रकल्प शिवसेना याठिकाणी कधीच होऊ देणार नाही. वेळ पडल्यास राज्य सरकारने वीज इतर राज्यांकडून विकत घ्यावी. पण हा प्रकल्प याठिकाणी आम्ही होऊ देणार नाही अशा शब्दात ठाकरे यांनी सुनावले.

Leave a Comment