भारताचा पाकिस्तान करणार्‍यांनो; चालते व्हा: उद्धव

जालना – दुष्काळग्रस्त भागात शेतकर्‍यांची कर्ज माफ करा. विद्यार्थ्यांची फी माफ करा. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने मराठवाड्यासाठी काहीही केले नाही. आज दुष्काळ पडल्यानंतर नव्या योजना आणण्याच्या गोष्टी करतात. नव्या योजना आखतील आणि त्याचा पैसा खातील. योजना कधीही पूर्ण होणार नाही. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सत्तेसाठी भांडणे आहेत. त्यांना मराठवाड्याच्या जनतेशी काहीही घेणेदेणे नाही, अशी टीका शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली.

उद्धव ठाकरे यांनी राज्यव्यापी दौरा सुरु केला आहे. त्यात पहिली सभा आज जालना येथे झाली. त्यावेळी त्यांनी दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांवर टीका केली. सोनिया गांधी, शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, राहुल गांधी यांनी मराठवाड्यात सभा घेण्याचे आवाहनही उद्धव यांनी केले.

मराठवाड्यात शरद पवार आता नव्या योजनांबाबत बोलत आहेत. खरे तर या योजना म्हणजे त्यांच्यासाठी ‘पाणी अडवा आणि पैसा जिरवा’; अशाच असल्याची टीका उद्घव यांनी केली. दुष्काळावर एका दिवसाचे विशेष अधिवेशन घेण्याची मागणीही त्यांनी केली.

काँग्रेस मतांसाठी लाचार असून देशात धार्मिक तेढ पसरविण्याचे काम करीत आहे, असे सांगून हिंदुत्त्व हेच राष्ट्रीयत्त्व असल्याचे उद्धव म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी एमआयएमच्या ओवैसी बंधुंना इशारा दिला. भारताचे पाकिस्तान करणा-यांनी चालते व्हावे. आम्ही ओवैसींच्या महेरबानीवर जगत नाही. ही ताकत त्या ओवैसींना दाखवून द्या, असे उद्धव म्हणाले.

Leave a Comment