आमच्याकडून जिगर घेऊन जा – बाळासाहेब ठाकरे

मुंबई, दि. ७ – शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी बरेच नेते ब्लॉगवरून राजकारण खेळत असल्याचा टोला लगावत आमचे राजकारण हे मैदानी आणि मर्दानी असल्याचेही खास ठाकरी भाषेत सुनावले आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या ब्लॉगवर जोरदार टीका करताना ते म्हणाले देश अराजकाच्या उंबरठ्यावर उभा असताना, अस्थिरतेतून दिशा दाखवण्याचे कार्य राष्ट्रीय लोकशाही आघाडीला करायचेय.

भारतीय जनता पक्षास नक्की काय झाले आहे ? त्यास एखादा आजार जडला आहे की तो अंतर्कलहाने बेजार झाला आहे ? असा प्रश्न विचारत देशात काँग्रेसच्या विरोधी वातावरण तापले आहे. राजस्थान, आसाममध्ये काँग्रेसची स्थिती दयनीय झाली आहे. जयललिता, नवीन पटनाईक, ममता बॅनर्जी आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसही राष्ट्रीय लोकशाही आघाडीबरोबर यायला मागेपुढे पाहणार नाही, असा राजकीय कयासही शिवसेनाप्रमुखांनी व्यक्त केला आहे.

आम्ही स्वतः फ्रीस्टाइल कुस्तीवाले आहोत. काँग्रेसला चारीमुंड्या चीत करण्यासाठी आम्ही कुठेही वार करू. कसेही लोळवू. कसेही तंगडे टाकून त्यांची टांग मारू’ असे म्हणत बाळासाहेबांनी २०१४ साठी आपण सज्ज असल्याचे सांगतानाच  ’मित्रा, हिंमत हरू नकोस ! असे म्हणत अडवाणींना धीर दिला आहे. मातोश्रीवर येऊन आमच्याकडून हिंमत व जिगर कामापुरती घेऊन जा’ असा उपरोधिक टोलाही बाळासाहेबांनी लालकृष्ण अडवाणींना लगावला आहे.

दोन दिवसांपूर्वी अडवाणींनी आपल्या ब्लॉगमध्ये ’लोकसभा निवडणूक २०१४ मध्ये काँग्रेस आणि भाजपला बहुमत मिळणे अशक्य’ असल्याचे भाकित वर्तवले होते. ’२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला १०० हून अधिक जागा मिळणे अवघड आहे तर भाजपही बहुमताच्या जादूई आकड्याला स्पर्श करु शकणार नाही. त्यामुळे काँग्रेस आणि भाजप त्यांच्या पक्षाच्या उमेदवाराला पंतप्रधान करण्यापेक्षा सहकारी पक्षाच्या नेत्याला पंतप्रधान करण्याची शक्यता अधिक आहे. तिसरी आघाडीही सत्ता स्थापन करण्याच्या स्थितीत असणार नाही’असे मत अडवाणींनी ब्लॉगद्वारे मांडले होते.

Leave a Comment