
आपली अर्थव्यवस्था ढासळत आहे. एखादी अर्थव्यवस्था नेमकी कशी आहे याची काही मीमांसा करायची झाली तर ती अनेक अंगांनी केली जाते. चलनवाढ, महागाई, गरिबांची अवस्था, विषमता, निर्यात, आयात, चलनाची किंमत, गुंतवणूक, रोजगार निर्मिती आणि लोकांचे राहणीमान यातल्या कोणत्याही अंगाने आपण आपल्या अर्थव्यवस्थेची आताची अवस्था तपासायला लागतो तेव्हा आपल्या हाती निराशाच येते. देशाच्या अर्थव्यवस्थेचे सतत अधःपतन सुरू आहे. महागाई वाढत आहे, आर्थिक विषमता वाढत आहे, परदेशी गुंतवणूक कमी होत आहे, निर्यात वाढत नाही, मंत्र्यांचा भ्रष्टाचार उतास आला आहे, रुपयाची किंमत ढासळत आहे, चलनवाढ कमी होण्याची चिन्हे नाहीत. २०२० साली भारत महाशक्ती होईल असे म्हणण्याची आपण तर हिंमत करत नाहीच पण खुद्द डॉ. कलामही आता याबाबत मौन राखून आहेत. असे सारे असतानाही आपले पंतप्रधान मात्र आपली अर्थव्यवस्था छान प्रगती करीत असल्याचे सांगून जनतेने घाबरून जाऊ नये असा धीर देत आहेत. प्रत्यक्षात, ‘आपले नेते निवांत आहेत’, एवढी एक गोष्ट वगळली तर आपल्या अर्थव्यवस्थेचा एकही घटक निरोगी दिसत नाही.
