आरोग्य चांगले राखण्यासाठी पर्याप्त झोप, व्यायाम आणि संतुलित आहार या तीन गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. या तीन गोष्टींपैकी एखादीतही संतुलन राखले गेले नाही तर बाकीच्या दोघांचेही संतुलन नष्ट होते आणि मग तिन्ही गोष्टी बिघडून जातात. उदाहरणार्थ झोप कमी झाली की, आहारही बिघडतो आणि आहार बिघडला की व्यायामातही सातत्य रहात नाही. या तीन गोष्टीत समतोल राखण्यास नेमकी कशापासून सुरूवात करावी असा प्रश्न अनेकांना पडतो पण झोपेपासून सुरूवात करणे कधीही श्रेयस्कर असते कारण प्रकृती बिघडण्याची प्रक्रिया झोपेपासूनच सुरू होत असते.
झोप कमी झाल्यास काय काय घडते याचा आढावा घेतल्यास आपल्याला झोप इतकी का महत्त्वाची आहे याची जाणीव होईल. झोप कमी झाल्यास शरीरातले कोर्टिसोल हे हार्मोन कमी होते. माणसातले चैतन्य या हार्मोनवर अवलंबून असते. कमी आणि अपुरी झोप घेणारे लोक मनाचे संतुलन गमावून बसतात. कोणत्याही घटनेची ताबडतोब आणि तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करण्याकडे त्यांचा कल असतो.
झोप कमी घेणारे लोक कमी वयातच वृद्ध दिसायला लागतात. पुरेसी आणि शांत झोप घेणारे लोक मात्र साठी गाठली तरीही पन्नाशीत असल्यागत दिसतात. अपुरी झोप घेणारे लोक स्नायूंचे विकार होण्याबाबत संवेदनशील असतात. अशा लोकांच्या छोट्या मोठ्या जखमाही दीर्घकाळ चिघळत राहतात. त्या लवकर भरून येत नाहीत.